पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना 30 जूनपर्यंत पैसे मिळणार
पुणे – महापालिका शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खरेदीसाठी यावर्षीही थेट बॅंक खात्यामध्ये रक्कम डीबीटीद्वारे जमा केली जाणार आहे. महापालिकेच्या सर्व शाळा येत्या 17 जूनला सुरू होणार असून 30 जूनपर्यंत 95 टक्के विद्यार्थ्यांना पैसे मिळतील, असा दावा शिक्षण प्रमुख शिवाजी दौंडकर यांनी बुधवारी केला.
पुणे महापालिका शाळांमध्ये 94 हजार 400 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये बालवाडीपासून ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. महापालिकेकडून विद्यार्थ्यांना पूर्वी शालेय साहित्य दिले जात होते. मात्र, त्यामध्ये होणारा भ्रष्टाचार आणि त्यातून होणारा विलंब लक्षात घेता शालेय साहित्य घेण्यासाठी रक्कम दिली गेली. मात्र, त्यावरही आक्षेप आल्याने गेल्या दोन वर्षांपासून पालकांच्या थेड बॅंक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाते. यामधून गणवेश, शालेय साहित्य, पुस्तके वह्या खरेदी कराव्यात असे बंधन आहे.
पुणे महापालिकेच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड माध्यमाच्या शाळा आहेत. त्याचबरोबर बालवाडीपासून मोठ्या गटापर्यंत 16 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना इयत्ताप्रमाणे रक्कम देण्यात येते. यावर्षी डीबीटीच्या नियोजनाची बैठक अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या उपस्थितीत पार पडली. प्रशासनाने येत्या शैक्षणिक वर्षासाठी संपूर्ण नियोजन केले आहे. सध्या प्रशासनाकडे 95 टक्के विद्यार्थ्यांचा बचत खात्यांची माहिती आहे. शाळा सुरू झाल्यानंतर उरलेल्या आणि नवीन विद्यार्थ्यांची माहिती घेण्यात येणार असल्याचे दौंडकर यांनी सांगितले.
मागील वर्षी राबविण्यात आलेल्या डीबीडी योजनेचा आढावा अग्रवाल यांनी घेतला. पालकांना थेट पैसे मिळत असल्यामुळे शहरात कोठूनही ते शालेय साहित्याची खरेदी करू शकतात. या योजनेमध्ये काही तृटी आढळल्यास त्या दूर करण्याच्या आम्ही प्रयत्नात असल्याचे दौंडकर यांनी नमूद केले.
“झिरो बॅलन्स’ बचत खाते उघडणार
पालकांच्या खात्यावर शून्य पैसे ठेव (झिरो बॅलेन्स) असल्यामुळे शालेय साहित्याच्या जमा पैशातून बॅंकेने पैसे कापून घेतले. यामुळे काही पालकांना संपूर्ण पैसे मिळाले नाहीत. यासाठी आता महापालिका अतितिक्त आयुक्त हे बॅंकांना पत्र देऊन विद्यार्थ्यांची (झिरो बॅलेन्स)खाती करावीत, अशी मागणी करणार आहेत. मागील वर्षी 5 हजार विद्यार्थ्यांचा चुकीचा तपशील मिळाल्यामुळे त्यांची रक्कम परत आली होती. त्यापैकी 4 हजार विद्यार्थ्यांचे पैसे परत जमा करण्यात आले. यावेळी अशी चूक होणार नाही, यासाठी कडक पावले उचलली जातील, असेही शिवाजी दौंडकर यांनी स्पष्ट केले.