श्रीनगर/ जम्मू – पवित्र अमरनाथ यात्रेला आजपासून कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये सुरुवात झाली. जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी यात्रेच्या प्रारंभीच्या “प्रथम पूजे’मध्ये सहभाग घेतला आणि राज्यातील शांततेसाठी प्रार्थनाही केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही यात्रा दोन मार्गांवरून केली जाणार असून दोन्ही मार्गांवरील यात्रेकरूंची पहिली तुकडी मार्गस्थ झाली आहे. पहलगाम आणि बाल्ताल मार्गावरच्या बेसकॅम्पवर संबंधित जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला, असे श्री अमरनाथ देवस्थान मंडळाच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्थेला सांगितले. एकूण 2,234 यात्रेकरू या यात्रेमध्ये सहभागी झाले असून त्यामध्ये 17 बालकांचाही समावेश आहे.
तत्पूर्वी जम्मूहून 4,417 यात्रेकरूंची तुकडीही अमरनाथच्या यात्रेसाठी बेसकॅम्पच्या दिशेने रवाना झाली. एकूण 1.5 लाख यात्रेकरूंनी या पहलगाम मार्गावरील यात्रेसाठी नोंदणी केली आहे. अमरनाथ यात्रेसाठी पहलगाम मार्गावरून 36 किलोमीटर तर बाल्ताल मार्गावरून 14 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो.
यात्रा सुरक्षित पार पडावी, यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. उपग्रहाच्या देखरेखी बरोबरच चीपद्वारे वाहन आणि यात्रेकरूंचे ट्रॅकिंगही केले जात आहे. 46 दिवसांची ही यात्रा 15 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनच्या दिवशी समाप्त होणार आहे.