राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय : अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या
पुणे – दहावीचा अभ्यासक्रमात मागील शैक्षणिक वर्षापासून बदल करण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देण्याची विद्यार्थ्यांना शेवटची संधी देण्यात आली होती. मात्र मार्च -2019 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यापुढील परीक्षेसाठी नवीन अभ्यासक्रमातील विषय घेऊन उत्तीर्ण व्हावे लागणार आहे, असा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे.
शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून इयत्ता दहावीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला. मार्च – 2019 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना नवीन व जुन्या अशा दोन्ही अभ्यासक्रमानुसार परीक्षा देण्याची संधी होती. जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देण्याची ही शेवटची संधी असल्याचे मंडळाने यापूर्वी जाहीर केले होते.दरम्यान, मार्च – 2019 च्या दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना यापुढे परीक्षा देताना आता नवीन अभ्यासक्रमातील विषय घेऊन परीक्षा द्यावी लागणार असल्याचे परिपत्रक राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी शनिवारी काढले आहे.
सामान्य गणित विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना यापुढे नवीन अभ्यासक्रमातील गणित भाग 1- व भाग -2 या विषयांची परीक्षा द्यावी लागणार असून यामध्ये उत्तीर्ण व्हावे लागेल.
माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (आयसीटी) विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ठ करण्यात आलेला स्व-विकास व कलारसास्वाद विषय घेऊन उत्तीर्ण व्हावे लागेल. तसेच यापूर्वी व्यक्तिमत्व विकास, समाजसेवा, कार्यशिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन आदी विषयांमध्ये उत्तीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांना आता स्व-विकास व कलारसास्वाद विषय घेऊन उत्तीर्ण व्हावे लागणार असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख, यंत्र अभियांत्रिकीची मूलतत्वे, विद्युत व इलेक्ट्रॉनिक्स तंत्रशास्त्राची मूलतत्वे आदी विषयांमध्ये उनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नव्याने अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या शालेय श्रेणी विषयातील स्व-विकास व कलारसास्वाद हा श्रेणी विषय घेऊन उत्तीर्ण व्हावे लागणार आहे.