नवी दिल्ली- भारताच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हेच पुन्हा आले तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी आणि काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी अधिक चांगली संधी उपलब्ध होऊ शकते असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान यांनी व्यक्त केले होते. आत्ता पर्यंत प्रचारात कॉंग्रेसचे लोक पाकिस्तानचीच भाषा बोलत आहेत आणि तेच त्यांची मदत घेत आहेत असे विधान मोदींसह भाजपच्या अनेक नेत्यांनी वारंवार केले होते. त्यामुळे इम्रानखान यांच्या या विधानाने भाजपची पंचाईत झाली आहे. त्यावर प्रतिक्रीया देताना संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे की ही कॉंग्रेसची खेळी असू शकते.
दरवेळी अशी विधाने कशी केली जातात हे समजत नाही. ही कॉंग्रेसची खेळी असू शकते असे माझे व्यक्तीगत मत आहे. हे सरकारचे किंवा भाजपचे मत नाहीं तर माझी व्यक्तीगत शंका आहे असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. मोदींना सेत्तवरून हटवण्यासाठी पाकिस्तानची मदत मागण्यासाठी कॉंग्रेसचेच काहीं लोक तिकडे गेले होते असे त्यांनी नमूद केले. इम्रान खान यांनी मोदींच्या बाबतीत असे विधान करणे हाही त्याच प्रयत्नांचा भाग असावा असे मला वाटते.
भारत 16 ते 20 एप्रिलच्या दरम्यान पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे असे विधान पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनी केले आहे. भारतात निवडणुका सुरू असल्याने राजकीय लाभ उठवण्यासाठी सरकारकडून पाकिस्तानच्या विरोधात ही आगळीक केली जाण्याची शक्यता आहे असे त्यांनी म्हटले होते. त्या विषयी विचारले असता त्या म्हणाल्या की त्यांना या तारखा कोठून मिळाल्या हे माहिती नाहीं. मी केवळ त्यांना शुभेच्छाच देण्याचे काम करू शकते असे त्यांनी आज एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
राफेलची कागदपत्रे बाहेर कशी फुटली याची आमचे मंत्रालय चौकशी करेल असेही निर्मला सीतारामन यांनी या विषयीच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.