भारतमाता की जय ही घोषणा जरूर द्या मात्र देश स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही तुमचीच आहे हे विसरू नका
वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणून आल्यानंतर आज वाराणसीमध्ये जाऊन मतदारांचे आभार मानले. मोदी म्हणाले, आम्ही व्होटबँकेचं राजकारण करत नाही. व्होटबँकेच्या राजकारणावर आमचा विश्वासही नाही. आम्ही व्होटबँकेचं राजकारण केलं असतं तर जिंकलो नसतो. आम्ही आहे तिथेच राहिलो असतो.
दरम्यान स्वच्छतेसंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याला आता ७५ वर्षे पूर्ण होतील मात्र आपण अजूनही अस्वच्छतेशी लढा देऊ शकलेलो नाही. देशात स्वातंत्र्यलढ्यादरम्यान जे वातावरण होते त्यानंतर ते दिसले नाही. हा माझा देश आहे ही भावना प्रत्येकाने जोपासली पाहिजे. भारतमाता की जय ही घोषणा जरूर द्या मात्र देश स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही तुमचीच आहे हे विसरू नका, असे मोदी म्हणाले.
वाराणसीतून उमेदवार म्हणून मी लढत होतो पण काशीतला प्रत्येक घरातला, रस्त्यावरचा माणूस या मतदानात नरेंद्र मोदी होऊन सहभागी झाला म्हणून एवढं यश मिळालं असेही मोदी म्हणाले. तसेच काशीतल्या लोकांनी दिलेल्या आशीर्वादामुळे मी विजयी झालो असल्याचे ते म्हणाले.