अहमदाबाद – भाजप आणि संघाच्या विरोधात आमची तत्वांची लढाई आहे. ही तत्वांची लढाई लोकांपर्यंत नेण्याची संधी आम्हाला संघ आणि भाजपमुळेच मिळाली आहे त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे असे प्रतिपादन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. एका कोर्ट केससाठी ते आज अहमदाबादला आले होते त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
भाजप आणि संघाच्या लोकांनी माझ्या विरोधात टाकलेल्या आणखी एका केस साठी मी येथे आलो आहे. ही लढाई आता त्यांच्यामुळेच आम्हाला लोकांपर्यंत घेऊन जाण्याची संधी मिळत आहे. मी त्यांचा आभारी आहे. सत्यमेव जयते अशी टिपण्णी त्यांनी यावेळी केली.
नोटबंदीच्या पहिल्या पांच दिवसांच्या काळात अमित शहा अध्यक्ष असलेल्या अहमदाबाद मध्यवर्ती सहकारी बॅंकेत तब्बल 750 कोटी रूपयांची रोकड भरण्यात आली. हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्या अनुषंगाने त्यांच्या विरोधात अहमदाबाद सहकारी बॅंक आणि त्यांच्या अध्यक्षांनी राहुल गांधी यांच्या विरोधात हा बदनामीचा खटला दाखल केला आहे. आमच्यावरील या आरोपात तथ्य नाही असे त्यांनी म्हटले आहे.