वॉशिंग्टन: इराण आणि अमेरीका यांच्यातील आखातातील तणाव सध्या युद्धजन्य स्थितीत पोहचला आहे. तथापी भारत हा आखाती देशांतून आयात केल्या जाणाऱ्या तेलावरच पुर्णपणे निर्भर असल्याने भारताची या तणावामुळे चिंता वाढली आहे. हा तणाव वाढू नये अशीच भारताची अपेक्षा आहे असे मत अमेरिकेतील भारताचे प्रतिनिधी हर्षवर्धन श्रृंगला यांनी व्यक्त केले आहे. ते आज येथे पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले की आखाती देशांच्या तेलावर आम्ही बहुतांशी निर्भर आहोत. त्या खेरीज आखातात मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरीक नोकऱ्या करीत आहेत. त्यामुळे तेथे स्थीरता राहणे हेच भारताच्या हिताचे आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यपुर्वेत आणखी जादा लष्कर पाठवण्याचा इशारा दिला आहे त्या पार्श्वभूमीवर श्रृंगला यांनी हे मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की अमेरिकेने केलेल्या सुचनेनुसार भारताने इराणमधून तेल आयात करणे थांबवले आहे. भारत इराणकडून 2.5 अब्ज टन तेल आयात करीत होता. इराणबरोबरच व्हेनेझुएला मधूनही भारताने तेलाची आयात थांबवली आहे.
भारताने त्या आखातात छाबहार बंदराच्या उभारणीचे काम हाती घेतले आहे. त्या कामाच्या प्रगतीत अमेरिकेचा अडथळा येणार नाहीं असेहीं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. ते म्हणाले की इराण मध्ये हे काम करण्यास अमेरिकेने भारताला अनुमती दिली आहे. इराणवरील निर्बंधांचा तेथील विकास प्रकल्पांवर विपरीत परिणाम अमेरिकेकडून होऊ दिला जाणार नाही.