जिल्ह्यातल्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला : विधानसभा उमेदवारांमध्ये उत्सुकता
सम्राट गायकवाड
सातारा – देशासह जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या अस्तित्वाच्या निकालासाठी आता केवळ दहा दिवस उरले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या सात पैकी सहावा टप्पा पूर्ण झाला आहे. आता अखेरच्या टप्प्यासाठी 19 तारखेला मतदान होणार आहे. त्यानंतर 23 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीत देशासह जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या निकालावरच आगामी विधानसभेची गणिते ठरणार असल्याने लोकसभा उमेदवारांसह विद्यमान आमदार, इच्छूक उमेदवार आणि जनतेच्या ही नजरा आता 23 मे च्या निकालाकडे लागून राहिल्या आहेत.
सन 1999 पासून राष्ट्रवादी कॉंग्रेसची जिल्ह्यावर मजबूत पकड राहिली आहे. तेव्हापासून ते 2014 च्या निवडणुकीपर्यंत दोन्ही लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत. मात्र, यंदाच्या निवडणुकीत विशेषत: भाजपने जिल्ह्यात संपूर्ण ताकद पणाला लावल्याचे दिसून आले. सातारा लोकसभा मतदारसंघासाठी तर ऐनवेळी भाजपमधून सेनेत उमेदवार आयात करण्यात आला. एवढेच नव्हे तर खुद्द मुख्यमंत्र्यांनी साताऱ्याचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यासाठी कोरेगाव व साताऱ्यात दोन सभा घेतल्या.
तर दुसऱ्या बाजूला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कराड येथे सभा घेतली. नरेंद्र पाटील यांनी तर निवडणुकीतील प्रचाराचे सर्व मुद्दे बाहेर काढले. असे असताना खा. उदयनराजे यांनी मात्र, संयमी भूमिका घेतली अन् फक्त केंद्र सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. कायम आक्रमक मुडमध्ये असणारे खा. उदयनराजे संयम दाखवत असताना दुसऱ्या बाजूला प्रचार सांगता सभेत खा. शरद पवार आक्रमक झाले अन् थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आव्हानाला उत्तर दिले.
दरम्यान, दुसऱ्या बाजूला पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली. पुन्हा उमेदवारी मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे भाजपने पवारांच्या युटर्नचा मुद्दा संपूर्ण राज्यात प्रचारासाठी वापरला. त्यामुळे पवारांनी बारामती इतकीच माढ्याची लढाई प्रतिष्ठेची केल्याचे दिसून आले. माढ्यात पवारांना मोहिते-पाटील अन् माणमधून गोरे बंधूंनी दणका दिला. त्यामुळे पवार अधिक आक्रमक झाले.
मतदारसंघात सर्वाधिक सभा त्यांनी घेतल्या. तर दुसऱ्या बाजूला माढ्यासाठी भाजपने कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष रणजितसिंह ना.निंबाळकर यांना आयात करून उमेदवारी दिली. त्यामुळे फलटणचे रणजितसिंह ना. निंबाळकर यांचे विरोधक व विधानपरिषदेचे सभापती रामराजे ना. निंबाळकर यांनी देखील प्रतिष्ठा पणाला लावली. तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी रणजितसिंह ना. निंबाळकर यांना कार्यकर्त्यांमार्फत पाठिंबा जाहीर केला. ऐवढेच नव्हे तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकलूजमध्ये सभा घेतली. त्यामुळे पवार आणि राष्ट्रवादीची डोकदुखी अधिक वाढली. वास्तविक भाजप-सेनेला एक अपवाद वगळता सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघ जिंकता आला नाही. त्यामुळे भाजप-सेनेकडे या निवडणुकीत गमवायला काही नाही. मात्र, दोन्ही मतदारसंघात अपयश आले तर आगामी विधानसभा निवडणूकीत त्याचे पडसाद दिसून येणार आहेत. तर राष्ट्रवादीचे सध्याच्या चार पैकी दोन हक्काचे खासदार या मतदारसंघातील आहेत. त्याचबरोबर सातारा लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत.
तर माढा लोकसभा मतदारसंघात सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यामुळे सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघ राखण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर उभे राहिले होते. त्या आव्हानाला सर्वोतपरी परतवण्याचे प्रयत्न नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांनी केले. आता मतदान होवून बघता बघता 20 दिवस उलटून गेले आहेत. निकालासाठी केवळ दहा दिवस बाकी राहिले आहेत. दोन्ही लोकसभा मतदारसंघात चुरशाने मतदान झाले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना निकाल काय लागेल, याचा अंदाज अद्याप येईना. त्यामुळे जस जशी 23 तारीख जवळ येत राहिल तस तसे नेत्यासंह कार्यकर्त्यांचे हार्ट बीट वाढताना दिसून येणार आहेत.