नवी दिल्ली – बालाकोटच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या अपयशी हवाई हल्ल्याच्यावेळी भारतीय हवाई दलाला तंत्रज्ञानविषयक प्रमाणबद्धतेचा अडथळा आला नसता, तर पाकिस्तानचे मोठे नुकसान करणे शक्य झाले असते, असे हवाई दलाच्या अहवालामध्ये म्हटले आहे. भारताने पाकिस्तानातील बालाकोट येथील जैश ए मोहंम्मदच्या दहशतवादी तळांवर 26 फेब्रुवारीच्या रात्री केलेला “एअर स्ट्राईक’ आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेली हवाई चकमक याविषयीच्या विविध बाजूंचे विश्लेषण या अहवालामध्ये करण्यात आले आहे. पुलवामामध्ये सीआरपीएफच्या बसवरील भीषण बॉम्बस्फोटात 40 जवान शहिद झाल्यावर हवाई दलाने बालाकोटला हा “एअर स्ट्राईक’ केला होता.
पाकिस्तानच्या हवाई दलाने 1998 च्या कारगिल युद्धापासून आपली संरक्षण आणि मारक क्षमता सातत्याने वाढवली आहे. त्याचनुसार भारतानेही हवाई आक्रमणातील तांत्रिक प्रमाणबद्धतेतील विषमता दूर करण्याची गरज असल्याचे या अहवालात म्हटले आहे. सध्या पाकिस्तानचा भर “अमराम’क्षेपणास्त्रे बसवलेल्या “एफ-16′ विमानांवरच आहे. दृष्टीपातळीबाहेरच्या लक्ष्यावर हवेतून हवेत मारा करू शकण्याची क्षमता असलेली राफेल लढाऊ विमाने आणि हवाई संरक्षण देणारी “एस-400′ क्षेपणास्त्र प्रणाली भारतीय हवाई दलामध्ये समाविष्ट झाली, तर पाकिस्तानपेक्षा अधिक प्रगत ठरेल, असे या अहवालात म्हटले आहे.
भारताने रशियाकडून “एस-400′ ही हवाई संरक्षण प्रणाली 5 अब्ज डॉलरला घेतली आहे. तर फ्रान्सकडून 58 हजार कोटी रुपयांना 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी केली जाणार आहेत.