दिनकरराव पाटील यांचे वर्धापनदिन समारंभात प्रतिपादन
वाई – तांत्रिक शिक्षणाला आत्मिक शिक्षणाची जोड दिली तर विद्यार्थ्यांच्या विकासाबरोबरच उन्नत समाजाची निर्मिती होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकरराव पाटील यांनी व्यक्त केले. जनता शिक्षण संस्थेच्या 52 व्या वर्धापनदिन समारंभामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव भोसले हे होते. याप्रसंगी उपाध्यक्ष शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंतराव चौधरी, सहसचिव प्रा. नारायणराव चौधरी, प्राचार्य डॉ. चंद्रशेखर येवले महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सी. ए. उदयभाई गुजर व उद्योजक मयूर व्होरा यांची व्यासपीठावर व संचालक सर्जेराव जाधव, सुरेश यादव व केशवराव पाडळे यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, वाई शहराला शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. देशभक्त किसन वीर यांनी सुरू केलेल्या या संस्थेला प्रतापराव भाऊंनी काळाबरोबर पुढे नेण्याचे काम केले आहे. तत्वांशी तडजोड न करता विदर्भ मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्याच्या शिक्षणासाठी सुरू केलेला सामाजिक बांधिलकी जपणारा जय किसान वसतीगृहाचा प्रकल्प आदर्शवत आहे. शिक्षणक्षेत्रामध्ये सध्या वेगाने डिजिटल क्रांती होत आहे. शिक्षणात तंत्रज्ञान अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे महाविद्यालयातील प्रत्येक वर्ग हा डिजिटल होणे आवश्यक आहे. प्रतापराव भोसले यांनी 52 व्या वर्धापनदिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जनता शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त आबासाहेब वीर व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कु. चारूशीला चव्हाण व प्रा. गणेश चव्हाण ईशस्तवन सादर केले. सचिव डॉ. जयवंतराव चौधरी यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. चंद्रशेखर येवले यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते न्यू इंग्लिश स्कूल धावडीचे मुख्याध्यापक शेलार व न्यू इंग्लिश स्कूल गोवेदिगरच्या मुख्याध्यापिका सौ. जाधव यांचा शाळेचा निकाल 100 टक्के लागल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच प्रा. डॉ. मंजुषा इंगवले यांचा पीएच. डी. पदवी मिळविल्याबद्दल सत्कार करण्यात आला. पदवी व पदव्युत्तर स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच क्रीडा, राष्ट्रीय छात्र सेना व कला सांस्कृतिक विभागात उल्लेखनीय यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून करण्यात आला. प्रा. डॉ. हणमंतराव जाधव यांनी केले.