पाथर्डी – राज्य शासनाने 1 नोहेंबर 2005 पूर्वीच्या विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी तालुक्यातील शिक्षकांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाच्या वित्त विभागाने 31 ऑक्टोबर 2005 रोजी राज्य शासनाच्या सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा नंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन अंशदान निवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र आमची 2005 पूर्वीची नियुक्ती आहे.
शासनाने ठरवून दिलेल्या कालावधीपूर्वी आमचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण झालेला आहे. आमच्या नेमणुकीस शिक्षण खात्याची मान्यता आहे. तसेच तुकड्यांना शासनाच्या अनुदान निकषप्रमाणे 100 टक्के अनुदान प्राप्त झालेले आहे. अनुदान प्राप्त झाल्यानंतर सेवकांचे शासनाच्या जुन्या पेशन योजनेअंतर्ग करावयाच्या कपातीसाठी भविष्य निर्वाह निधी खाते उघडण्यात आले आहे. वेतन देयकातून भविष्य निर्वाह निधीची नियमित कपात आजतगायत चालू आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या 29 नोहेंबर 2010 च्या शासन निर्णयामध्ये याबाबत कोणताही खुलासा अगर स्पष्ट सूचना नाहीत. तसेच पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालकांनी 13 मे 2009 च्या पत्राने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकांना लिहिलेल्या पत्रामध्ये अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील जे कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त आहेत, त्यांना पूर्वीचे सेवानिवृत्तीचे नियम लागू असतील, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत त्यांच्या नियुक्तीस शिक्षणाधिकारी (माध्य.) यांनी मान्यता दिलेल्या आहेत, अशा कर्मचाऱ्यांना पूर्वीचे सेवानिवृत्तीचे नियम लागू होतील, अशा कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते सुरू करण्यासाठी वेतन पथकाकडे तातडीने प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना दिल्या.
मात्र वेतन पथक कार्यालयाने 1 नोहेंबर2005 पूर्वी विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळेतील तसेच तुकडीवरील सेवकांचा भविष्य निर्वाह निधी कपात करण्यास विरोध दर्शविला. याबाबत उच्च न्यायालयात दाद मागितीली. न्यायालयाने सेवकाची नियुक्ती 1 नोहेंबर 2005 पूर्वीची आहे, याची खात्री करून वेतन पथकाने घेतलेल्या आक्षेपास अंतरिम स्थगिती दिली. या बाबींचा विचार करून जुनी पेन्शन योजना मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विठ्ठल दहिफळे, दत्तात्रय बोरुडे, सुभाष गव्हाणे, अशोक सानप, प्रशांत रक्ताटे, अजय फुंदे, अशोक कदम, संजय उगलमुगले, बाबासाहेब वांढेकर, भगवान खाडे, रावसाहेब घुले, महादेव पालवे, अण्णासाहेब नाकाडे, सदाशिव तांदळे उपस्थित होते.