नवी दिल्ली – जुलै महिन्यापर्यंत 255 बसचे वितरण विविध राज्यांच्या सार्वजनिक उपक्रमांसाठी करण्यात येणार असल्याचे टाटा मोटर्सने स्पष्ट केले आहे. वितरित करण्यात येणाऱ्या बसमध्ये बॅटरी पुरवठयाच्या अडचणी निर्माण होत असल्यामुळे वितरण जुलैपर्यंत करण्यात येईल, असे कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पहिल्या टप्प्यातील 72 इलेक्ट्रिक बस लखनौ, कोलकाता, इंदोर, गुवाहाटी आणि जम्मू-काश्मीर या ठिकाणी पोहोचण्याच्या मार्गावर आहेत. या बसच्या वितरण पुरवठयात विलंब झाल्याबद्दल सरकारने काळया यादीत टाकल्याचे विधान टाटा मोटर्सने फेटाळले आहे. तसेच सर्व राज्यातील सार्वजनिक उपक्रमांच्या संपर्कात कंपनी असून विविध प्रकारच्या चाचण्या घेण्यात येत असल्याचे कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सर्व काही वेळापत्रकाप्रमाणे होत आहे.
बॅटरीची आयात अन्य बाजारपेठांमधून होत असल्याने पुरवठ्यात अडचणी निर्माण होत आहेत. परंतु, या अडचणी लवकरात लवकर दूर करण्यात येणार आहे. यासाठी सर्व ग्राहकांशी संपर्क साधण्यात येत आहे. कंपनीने इलेक्ट्रिक बस पुरवठ्याच्या कंत्राटापैकी 50 टक्के वाहनांचे वितरण मार्च 2019 पर्यंत केले आहे. यातील अन्य 25 टक्के वाहनांचे वितरण एप्रिल 2019 पर्यंत तर उर्वरित जुलै महिन्यापर्यंत होणार असल्याचे, टाटा मोटर्सने स्पष्ट केले आहे.