– श्रीकृष्ण पादिर
पुणे – लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर वेध विधानसभेचे लागले आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असताना येथून आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी तुल्यबळ लढत देत हा मतदारसंघ शिवसेनेकडून खेचून घेत पुन्हा आघाडीकडे आणला. यामध्ये आघाडीतील सहाही विधानसभेतील नेत्यांनी मनापासून काम करीत आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यात मोलाचा वाटा उचलला. याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून विधानसभेला अगोदरच काळजी घेतली जात आहे. विधानसभा “टार्गेट’ ठेवत मैदानात उतरण्यापूर्वीच “अर्धी लढाई जिंकण्याचे मनसुबे’ युतीचे असून घडणाऱ्या घडामोडी पाहता त्यादृष्टीने वाटचाल दिसत आहे.
केंद्रात जसे भाजपप्रणित एनडीए सरकारने निर्विवाद बहुमत मिळवले त्याच इराद्याने राज्यातही सत्ता आणण्याचा महायुतीचा प्रयत्न असणार आहे. त्या दृष्टीने देशासह राज्यात अनेक विविध घडामोडी घडत असताना जिल्ह्यातही या घडामोडींनी वेग घेतला आहे. गेली महिनाभराचा काळ लक्षात घेता विरोधात असणाऱ्या आघाडीतील बड्या नेत्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न होत आहेत. तोंडावर आलेली विधानसभा निवडणूक आणि बड्या नेत्यांना टार्गेट करीत त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याचा कालावधी म्हणजे याला योगायोगच म्हणावा लागेल. हे राजकीय धुरीण ठामपणे सांगू शकतील; परंतु एकंदरीत घडलेल्या घडामोडींवरून राजकीय बाजूने खोलात जाऊन विचार केल्यास विधानसभेसाठी युतीच्या उमेदवारांसाठी मतदारसंघ “सेफ’ करण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत.
धांदल कोणाची उडणार?
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्यावर गेल्याचा आठवड्यात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबतचे प्रकरण जुने असले तरी दिलेली फिर्याद आणि गुन्हा दाखल होण्याची ही वेळ नक्कीच चकीत करणारी आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयात या नेत्याचा मोठा वाटा होता हे सर्वांना ज्ञात आहे. किंबहुना शिरूर लोकसभा मतदारसंघातील ते आघाडीच्या पहिल्या फळीतील स्टार प्रचारक राहिले. प्रचार काळातदेखील वेगवगळ्या व्यासपिठांवर हजर होत त्यांनी युतीच्या नेत्यांची चांलीच धांदल उडवल्याचे पाहायला मिळाले. प्रथमतः खासदारकीसाठी इच्छुक असलले पैलवान बांदल हे शिरूर विधानसभा मतदारसंघातून आघाडीच्या वतीने आमदारकीसाठी प्रबळ दावेदार आहेत. युतीच्या उमेदवाराला ते चांगली लढत देऊ शकतात, एवढी ताकदही त्यांच्यात नक्कीच आहे. “तन-मन-धन आणि बोलबच्चन’ याबाबतीत तर ते सर्वांपेक्षा वरचढ आहेत. मात्र मागील आठवड्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांची बाजू कमकुवत होताना दिसत आहे.
खेडमध्ये आजी-माजी आमदारांमध्ये द्वंद्व
खेड तालुक्यात तर प्रतिस्पर्धी असलेले माजी आमदार दिलीप मोहिते यांना अटक करण्याची तयारी सुरू आहे. वर्षभरापूर्वी (30 जुलै 2018) मराठा आंदोलनादरम्यान चाकण येथे झालेल्या हिंसाचाराचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दंगलीनंतर एसआयटी पथकाने केलेल्या चौकशीचा अहवाल हा दिलीप मोहिते यांच्या विरोधात आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणीदेखील झाली; मात्र पोलिसांचे म्हणणे ऐकून घेण्याकरिता ही सुनावणी गुरुवारी (दि. 18) पुन्हा एकदा होणार आहे. मागील आठवड्यात अचानक खेड तालुक्यात बंदोबस्त वाढल्याने ही बाब उजेडात आली. त्यानंतर माजी आमदार दिलीप मोहिते हे संपर्कात नाहीत. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याबरोबर ते मुख्यमंत्र्यांकडे गेले असल्याची चर्चादेखील सुरू होती; मात्र पुढे काय झाले, त्याचा अधिकृत तपशील मिळू शकला नाही. यांनतर मोहितेसमकिांनी माजी खासदार शिवाजीराव आढळरावच पाटील यांसह विद्यमान आमदार सुरेश गोरे यांच्यावर पलटवार करीत हा गुन्हा विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मोहितेपाटील यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करीत पोलीस कारवाई सुरू असल्याचा आरोप केला. केवळ आरोप करून न थांबता निषेध सभा घेऊन पोलीस, तहसीलदार, जिल्हाधिकारी व मुख्यमंत्र्यांना त्यांनी निवेदन दिले. यावर आमदार गोरे यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेत आरोपांत तथ्य नसल्याचे सांगितले.
जायंट किलर अडचणीत…
दुसरीकडे त्यांच्या शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील पैलवान बांदल यांचे प्रतिस्पर्धी असलेले माजी आमदार ऍड. अशोक पवार हे देखील विधानसभेला पक्षाकडून इच्छुक उमेदवार आहेत. ऍड. पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी व जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार पुत्राचा पराभव करणारे, शिरूरमधील जायंट किलर म्हणून ओळखले जाणारे जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र जगदाळे यांच्यावरही एका प्रकरणात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सावकारकी केली व फिर्यादीला त्रास दिला दिला म्हणून शिरूर पोलीस ठाण्यात दाखल झोलल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. जगदाळे व अन्य तिघांविरोधात फिर्याद देणारे हे विद्यमान आमदार यांच्याच आडनावाचे आहेत, हादेखील योगायोगच आहे. पै. मंगलदास बांदल व राजेंद्र जगदाळे यांच्यावर पाठोपाठ गुन्हे दाखल झाल्याने राष्ट्रवादी या तालुक्यात काही प्रमाणात बॅकफूटवर गेल्याचे दिसते.
जुन्नरमध्ये “आशा’वादी…
जुन्नर मतदारसंघातही मात्र यावेळी वेगळी परिस्थिती आहे. ऐन लोकसभा निवडणुकीत मानापमान नाट्य घडले. राजकीय फायद्यासाठी आमदार शरद सोनवणेंचा शिवसेना प्रवेश करवून घेतला; मात्र निष्ठावंत शिवसैनिकांना तो रुचला नाही. यातून नाराजीनाट्य संपूर्ण प्रचारादरम्यान पाहायला मिळाले अन् विरोधी आघाडीच्या उमेदवाराचा फायदा झाला. निवडणुकीचा निकाल आल्यानंतर शिवसेनेची आहे ती हक्काची मतेदेखील पक्षाच्या उमेदवाराला मिळू शकली नाहीत. त्यामुळे तब्बल महिनाभर उहापोह होत शिवसेनानेत्या आशा बुचके यांना थेट बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. ऐन निवडणुकीत घात नको म्हणून पक्षाने अगोदरच ही खबरदारी घेतली. कारण मागील काही निवडणुकांचा अनुभव पाहता पक्षाची तालुक्यात ताकद असूनही केवळ “गद्दारी अन् गटबाजी’मुळेच गेली 20 वर्षे तालुक्यावर भगवा फडकवण्यात शिवसेनेला अपयश आले आहे. यावेळी शिवसेनेसह राष्ट्रवादीदेखील “आशा’वादी आहे. येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेला यश मिळणार की, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल!