13 लाख 47 हजार नागरिकांची 826 टॅंकरने भागवली जाते तहान
नगर – जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढतच चालली असून पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टॅंकरच्या संख्येत वाढ होत आहे. 571 गावांना सध्या 826 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील 13 लाख 47 हजर 444 नागरिकांची 826 टॅंकरने पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागवली जात असून, 2016 च्या दुष्काळाच्या तुलनेत यंदा टॅंकर बाजी मारणार असल्याचे दिसत आहे.
गेल्या वर्षी उन्हाळ्यात जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरची संख्या अत्यंत कमी राहिली. मागील दोन वर्षात जिल्हाभरात राबविण्यात आलेले जलयुक्त शिवार अभियान आणि त्यानंतर गतवर्षीच्या हंगामात झालेला पुरेसा पाऊस यामुळे दुष्काळी गावांची संख्या घटली होती. परंतु यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे मोठ्या प्रस्ताव दाखल करण्यात आले असून आज अखेर 826 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अपुऱ्या पावसामुुळे उद्भवलेली पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आज अखेर 571 गावे व 3 हजार 196 वाड्या वस्त्यासाठी 826 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असून जिल्ह्यातील सुमारे 13 लाख 47 हजार 444 नागरिकांची तहान भागवली जात आहे.
सन 2012 मध्ये 381 मिलीमिटर सरासरी पेक्षा पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे 2013 मध्ये पाण्याची भूजल पातळी खालवल्याने जिल्ह्यातील 504 गावांसह 2 हजार 506 वाड्यावस्थांवर 707 टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात आला. तसेच 2015 मध्ये 383 मिलीमिटर पाऊस झाला. त्यामुळे 2016 मध्ये उन्हाच्या झळा अधिक तिव्र झाल्याने 516 गवांसह 2 हजार 989 वाड्यावस्थावर 826 टॅंकर द्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र यंदा दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याने टॅंकरच्या संख्येत वाढ होणार असून सर्वाधिक टॅंकरची नोंद केली होईल.
सध्या सर्वाधिक टॅंकर पाथर्डी, पारनेर तालुक्यासाठी तर कर्जत तालुक्यात टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. राहुरीत टॅंकर सुरू असून तालुक्यात 3 टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. पाणीटंचाईची भीषणता दिवसेंदिवस वाढत असून टॅंकरच्या संख्येत ही वाढ होत आहे. सर्वाधिक टॅंकर वाढले ते फेब्रुवारी- मार्च दरम्यान तब्बल 190 टॅंकरची वाढ झाली होती. एप्रिल महिन्यात 64 तर मे महिन्यात 26 टॅंकरची वाढ झाली. परंतु जिल्ह्यात पाणीटंचाईची स्थिती पाहता टॅंकरच्या संख्येने ऐन तीव्र उन्हाळ्यात कमी वाढ झाली आहे.
25 डिसेंबर 2018 रोजी जिल्ह्यात 256 गावे, 1 हजार 315 वाड्यांना 315 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. 5 लाख 64 हजार 452 लोक टॅंकरवर अवलंबून होते. त्यानंतर 25 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात 376 गावे, 1 हजार 947 वाड्या 485 टॅंकरद्वारे 8 लाख 15 हजार 216 लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. डिसेंबर ते फेब्रुवारी या दोन महिन्यात 170 टॅंकर वाढले होते. 31 मार्च रोजी 444 गावे, 2 हजार 499 वाड्यांना 675 टॅंकरने पाणीपुरवठा होत होता. 10 लाख 32 हजार 560 लोकांना हा पाणीपुरवठा करण्यात येत होता. फेब्रुवारी ते 31 मार्चपर्यंत तब्बल 190 टॅंकर वाढले होते. त्यानंतर 10 एप्रिल रोजी 469 गावे, 2 हजार 631 वाड्यांना 708 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यावेळी 10 लाख 85 हजार 21 लोकांना टॅंकरचे पाणी देण्यात येत होते.
या 11 दिवसात 33 टॅंकर वाढले. 28 एप्रिल रोजी 504 गावे, 2 हजार 774 वाड्यांना 754 टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. या 18 दिवसांत तब्बल 46 टॅंकर वाढले. यावेळी 11 लाख 69 हजार 15 लोकसंख्येला पाणीपुरवठा होत होता. 7 मे रोजी 528 गावे, 2 हजार 956 वाड्यांना 772 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. या 9 दिवसात 18 टॅंकर वाढले. त्यानंतर 21 मे रोजी 538 गावे, 3 हजार 75 वाड्यांना 782 टॅंकरने तर 26 मे रोजी 558 गावे, 3 हजार 138 वाड्यांना 808 टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आज 571 गावे, 3 हजार 196 वाड्यांवरील 13 लाख 47 हजार 444 नागरिकांची तहान 826 टॅंकरने भागविली जात आहे.