पुणे – पुणे शहरातील कोंढवा भागात भिंत कोसळुन 15 जण दगावले आणि 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना दुर्दैवी असून या घटनेबद्दल मी तीव्र शोक व्यक्त करते. तर या प्रकरणी सरकारने गंभीर दखल घेतली आहे. सरकारकडून मृत आणि जखमींच्या नातेवाइकांना सर्वतोपरी मदत केली जाईल तसेच या घटनेतील जे जे दोषी असतील त्यांची चौकशी करून कडक कारवाई केली जाईल.असे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी माध्यमाशी संवाद साधतांना सांगितले.
दरम्यान, पुण्यातील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदना व्यक्त केली असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. तसेच या दुर्घटनेतील मृत्यूला बिल्डर आणि महापालिकेचे अधिकारी दोषी आहेत असा आरोप माजी आमदार महादेव बाबर यांनी केला आहे. तर महापौर मुक्ता टिळक, मनसेचे गटनेते वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.