लग्नामध्ये नको त्या गोष्टींवर खर्च वाढतोय : कार्यमालक कर्जात बुडतोय
लाखणगाव – विवाह समारंभानंतर वरातीमध्ये दारूचा वारेमाप वापर, दारू पिणारी तरुणाई, रात्रीचे वेळी आकाशात उडणारे फटाके त्यावर होणारा खर्च आणि या खर्चाचा बोजा मोठा असतो. त्यामुळे बडेजावपणा म्हणून अनेक सामान्य लोक आर्थिक अडचणीत येत आहेत. मागील तीन वर्षांपासून शेतीपिकांना नसणारे बाजारभाव त्यामुळे उत्पन्न शून्य आणि भांडवली खर्चाचा बोजा डोक्यावर ही परिस्थिती असताना लग्नावर होणारी उधळपट्टी लग्नात रूढ झालेले हे अनेक चुकीचे प्रकार यामुळे हे प्रकार थांबले पाहिजेत, अशी भूमिका ज्येष्ठ मंडळी घेत असतात; मात्र वारेमाप खर्च करताना तरुणाई मात्र ज्येष्ठांच्या शब्दांना तिलांजली देत आहे.
लग्नसराईची धामधूम सध्या जोरात सुरू असून घरी व सामुदायिक सोहळ्यात लग्न करण्यापेक्षा मंगल कार्यालयात लग्न करण्याकडे कार्य मालकांचा जोर आहे. त्यातच यावर्षी बासुंदी आणि आमरस या पदार्थांची जेवणामध्ये सर्वात जास्त पसंती असल्याचे दिसत आहे. लग्न म्हटले की येणाऱ्या पाहुण्यांना चांगले जेवण दिलेच पाहिजे. त्यामुळे उपस्थित असलेले वऱ्हाडी जेवणासाठी जेवणाच्या हॉलच्या दारात उभे असल्याचे पाहावयास मिळते. त्याचप्रमाणे यावेळी उपस्थित लोकांचा सत्कार फेटा, टोपी, रुमाल, टॉवेल देऊन केला जातो. महिलांना साड्यांचे वाटप केले जाते. त्यामुळे या सत्कार समारंभावरही मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च केला जातो. त्यानंतर नवरदेवाचे मिरवणुकीत अनेक प्रकारचे वाजंत्री, डीजे यांच्यावरही भरमसाठ खर्च केला जातो. पूर्वी लग्नाच्या वेळेस येणाऱ्या पाहुण्यांना गंध लावण्याचे काम स्वतःच्या घरातली भावकीतील मंडळी करायची. सध्या या कामासाठी रोजंदारीवर माणसे आणली जात आहेत. अक्षता वाटण्यासाठी महिला, मुली तसेच प्रवेशद्वारावर चोपदार आणून त्यांना रोज दिला जातो. त्याचप्रमाणे लग्नाच्या वेळेसही मंगलाष्टके म्हणण्यासाठी आणि स्वागत गीत गायनासाठी बाहेरून व्यक्ती आणून त्यावरही मोठा खर्च केला जातो. लग्नानंतर होणारी फटाक्यांची आतषबाजी, त्याचप्रमाणे रात्री वरातीत होणारा अवाढव्य खर्च चुकीचा आहे.
अन्नाचीही मोठी नासाडी
विवाह समारंभ उठावदार व्हावा म्हणून जेवणात विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. त्यातील निम्मे पदार्थ ताटातच वाया जातात. असे असतानाही होणारी अन्नाची नासधूस यावर कुठेतरी प्रतिबंध आला पाहिजे, अशी भावना ज्येष्ठ मंडळी व्यक्त करताना दिसत आहे. त्यामुळे सध्याच्या काळात होणारे भपकेबाज विवाह ग्रामीण भागात चर्चेचा विषय ठरत आहे. लग्नसराईच्या हंगामात यावेळी मात्र लापशी आणि शिऱ्याची वाणवा जाणवत होती. यावेळी आंबा रस आणि बासुंदीने वऱ्हाडी मंडळींना तृप्त केले. उन्हाळ्याचा कडाका असल्याने पिण्यासाठी थंड पाणी आणि मठ्ठ्याची वऱ्हाडी मंडळींनी चव चाखली. यंदाच्या लग्नसराईत मोठ्या प्रमाणात अन्नाचीही उधळपट्टी आणि फटाक्यांची आतषबाजी पाहावयास मिळाली. मानपानासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक उधळपट्टी झाल्याचे दिसून आले. यावर जनजागृती होणे गरजेचे आहे.