महामार्ग पोलीस विभागाने केल्या सर्व पथकांना सूचना
पुणे –सातत्याने सूचना देऊनही आणि कारवाईचा बडगा उगारुनही बेशिस्त वाहनचालकांना अद्यापही आळा बसलेला नाही. त्यामुळे सर्वाधिक वेगवान समजल्या जात असलेल्या एक्सप्रेस वे वरील अपघातांची संख्या कमी झालेली नाही. त्याशिवाय वर्दळीच्या काळामध्ये वाहतूक कोंडीही होत आहे. त्याचा त्रास अन्य वाहनचालक आणि प्रवाशांना होत आहे. त्याची गंभीर दखल महामार्ग पोलिसांनी घेतली आहे. त्यानुसार येत्या सोमवारपासून (दि. 27) अशा बेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात सर्व पथकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
गेल्या काही वर्षांच्या कालावधीत सर्वाधिक वेगवान समजला जात असलेला पुणे-मुंबई हा एक्सप्रेस वे हा वेगळयाच कारणांनी चर्चेत आला आहे. लेन कटिंग, रॅश ड्रायव्हिंग आणि वाहतुकीचे अन्य नियमच पाळले जात नसल्याने या महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. विशेष म्हणजे या महामार्गावर आतापर्यंत झालेल्या अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. तर अनेकांना कायमचे अपगंत्व आले आहे. त्याची गंभीर दखल महामार्ग पोलिसांनी घेतली होती. त्यानुसार अशा वाहनचालकांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. त्यामाध्यमातून महामार्ग पोलिसांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल केला आहे.
त्यामुळे या बेशिस्त वाहनचालकांना आळा बसेल असा महामार्ग पोलिसांचा अंदाज होता. मात्र, महामार्ग पोलिसांचा हा अंदाज सपशेल चुकीचा ठरला आहे. मोठ्या प्रमाणात कारवाई होऊनही वाहनचालकांमध्ये अद्याप फारसा फरक पडलेला नाही. विशेष म्हणजे लेन कटिंग, रॅश ड्रायव्हिंग आणि नियम भंग करण्यामध्ये बहुतांशी वाहनचालक आघाडीवर असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच अपघातांच्या संख्येमध्ये वाढ होत असून वाहतूक कोंडीही वाढत आहे, या प्रकाराची महामार्ग पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार अशा वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. त्यानुसार येत्या दोन दिवसांमध्ये ही कारवाई कडक करण्यात येणार आहे, त्यासाठी सर्व पथकातील प्रमुखांना सूचना देण्यात आल्या असून या कारवाईत कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा महामार्ग पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी ” दैनिक प्रभात’ शी बोलताना दिली.