पुणे – “आरटीई’ चे प्रवेश नाकारणाऱ्या अशोकनगर येथील एसईएसच्या गुरुकुल शाळेवर कारवाई व्हावी, यासाठी आप पालक युनियनतर्फे पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारात धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबतचे आदेशही जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी बजाविले आहेत.
गुरूकुल शाळेत “आरटीई’ अंतर्गत प्रवेशाच्या 15 जागा दाखविण्यात आल्या आहेत. मात्र, शाळा 5 विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यावर ठाम आहे. प्रवेशाची लॉटरी लागलेल्या 9 विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी समितीकडून तपासणी पूर्ण झाली आहे. तपासणी पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तरी शाळेने प्रवेश द्यावेत, अशी मागणी आप पालक युनियनचे मुकुंद कीर्दत व इतर पालकांनी केली आहे. मात्र शाळेने या मागणीची दखल अद्यापही घेतलेली नाही. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी आपल्या मुलांसह धरणे आंदोलन केले.
शाळेविरोधात पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यावर शाळा व्यवस्थापनाचे प्रतिनिधी, महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी, तक्रारदार पालक यांची एकत्रित सुनावणीही घेतली होती. त्यावर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे यांनी सुनावणीचा निर्णयही दिला होता.