नवी दिल्ली – राज्यसभेचे विद्यमान सदस्य मदनलाल सैनी यांच्या निधनामुळे आज त्यांना आदरांजली वाहण्यासाठी राज्यसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकुब करण्यात आले. अशा घटनांमध्ये सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकुब केले जाते पण यावेळी वेगळा पायंडा पाडताना अध्यक्ष व्यंकैय्या नायडू यांनी सभागृहाचे कामकाज केवळ दुपारी दोन वाजेपर्यंतच तहकुब केले जात असल्याचे नमूद केले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चा आजच संपुष्ठात आणायची असल्याने आणि त्यावर उद्या पंतप्रधान उत्तर देणार असल्याने अध्यक्षांनी हा निर्णय घेतला. पंतप्रधान विदेश दौऱ्यावर जाणार आहेत त्यामुळे त्यांचे उत्तराचे भाषण उद्या ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आजच आभार प्रदर्शक ठरावावर आज चर्चा पुर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी दिवसभराची तहकुबी टाळण्यात आली. तत्पुर्वी अध्यक्षांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला. सैनी हे कामगारांच्या हक्कंसाठी लढणारे नेते होते अशा शब्दात अध्यक्षांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.