भरती प्रक्रिया पारदर्शी : राजेंद्र घोरपडे
शिक्षक बॅंकेत होणारी कर्मचाऱ्यांची भरती सहकार व रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार होत आहे. त्याचबरोबर भरती प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होणार असून त्यामध्ये पुर्णत: पारदर्शकता आहे. त्यामुळे सभासदांनी केलली मागणी व आरोप चुकीचे असल्याचे मत बॅंकेचे चेअरमन राजेंद्र घोरपडे यांनी व्यक्त केले.
सातारा – प्राथमिक शिक्षक बॅंकेत कर्मचाऱ्यांची नव्याने भरती केल्यास व्यवस्थापनावरील खर्च वाढणार आहे. त्याचबरोबर भरती प्रक्रियेत संचालकांचे नातेवाईकांची भरती होण्याची शक्यता असल्यामुळे भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करा, अशी मागणी बॅंकेच्या सभासदांनी केली आहे. साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ठराविक सभासदांनी एकत्र येत भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली. यावेळी राजेश बोराटे, धनसिंग सोनावणे, गणपत बनसोडे, मारूती ढगे, सुरेश नाळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोराटे म्हणाले, 30 जुन रोजी बॅंकेच्या संचालक मंडळांच्या बैठकीत ठरावानुसार कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी 2013 मध्ये झालेली भरती अनावश्यक असल्याचा आरोप तत्कालिन विरोधक आणि विद्यमान सत्ताधारी यांनी केला होता. त्याचबरोबर सत्तेत आल्यानंतर 2013 मध्ये झालेली भरती अनावश्यक असल्याचा ठराव करण्यात आला होता. ठरावाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्यावर सत्ताधाऱ्यांनी न्यायालयात ही भरती अनावश्यक असल्याचे म्हणने सादर केले होते. न्यायालयाने बॅंकेचे म्हणने ग्राह्य धरले. मात्र, त्यानंतर नोकरीतून काढण्यात आलेल्या 26 कर्मचाऱ्यांना 2018 मध्ये पुन्हा नोकरीत सामावून घेतले. यामध्ये आर्थिक तडजोड झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
अशा स्थितीत सध्या डिजिटलायझेनचे युग असून बॅंक कमीत कमी कर्मचाऱ्यांवर चालविणे सोपे आहे. त्यामुळे व्यवस्थापन खर्चात बचतही होते. मात्र, नव्याने 37 कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत संचालकांच्या नातेवाईकांची मुले भरती करण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर नव्याने होणाऱ्या भरतीमुळे बॅंकेला मोठा भार सहन करावा लागणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी मागणी बोराटे यांनी केली.