सोलापूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे राज्यात सभा घेत आहेत. त्यांनी यापूर्वी नांदेड येथील सभेतून नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर टीका केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढवत नसले तरी भाजप विरोधात त्यांनी कंबर कसली आहे. आज सोलापुरात बोलताना ठाकरे म्हणाले, पंतप्रधान मोदींना नोटाबंदीचा झटका आला, त्याचा परिणाम काय झाला? देशातील साडेचार ते पाच कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या असल्याचे ठाकरे म्हणाले.
निवडणूक म्हणजे तुमच्या ५ वर्षं निघून जातात, आणि अशा वेळेला सत्ताधारी तुमच्यासमोर येऊन खोटं बोलतात, तुम्हाला फसवतात आणि हे का होतं कारण निवडणूक हा विषय आपण गांभीर्याने घेतच नाही. आपण हुरळून जाऊन मतदान करतो आणि पुढे घडतं काय तर गेल्या ५ वर्षात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ वर्षांपूर्वी जी दाखवलेली स्वप्न आहेत त्याविषयी बोलत नाहीयेत तर बोलत काय आहेत तर पुलवामा हल्ल्यातील शहिद जवानांच्या जीवावर मतं मागत आहेत, ऐअरस्ट्राइकच्या जीवावर मतं मागत आहेत?, असा आरोप राज ठाकरेंनी केला.
भाषणातील ठळक मुद्दे
- मोदी शहिदांच्या नावावर मतं मागतायेत
- मी एकही उमेदवार दिलेला नसताना फिरतोय, हे लोक दर पाच वर्षांनीच तुम्हाला भेटतात, वाट्टेल त्या थापा मारयाच्या, खोटं बोलायचं, तुम्ही मतदान करता, पण पदरी काय पडतं?
- अगोदरचे वाईट सांगून हे (भाजप) आले, हे त्यांच्यापेक्षा वाईट निघाले, माझ्या सभांचा खर्च कसा मोजायचा हा प्रश्न भाजपला पडलाय
- महाराष्ट्रातल्या नोकऱ्यांमध्ये जर स्थानिक लोकांनाच फक्त प्राधान्य दिलं तर आरक्षणाची गरजच नाही. आज ग्रामीण महाराष्ट्रातील तरुण बेरोजगार बसला आहे. आणि आपण सगळे जातीच्या चर्चांमध्ये अडकलोय. मुळात सरकारी नोकऱ्या राहिल्यात किती? जातीवरून मतं मिळवण्यासाठी आरक्षणाची आमिष दाखवत आहेत
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक भाजप करणार होते, ५ वर्ष झाली, कुठे आहे स्मारक. डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाची माझी कल्पना आहे की जगातलं सगळ्यात मोठं वाचनालय उभं करा. जगातले लोकं इथे ज्ञान घ्यायला येऊ देत तिथे, हेच खरं स्मारक असेल
- शिवस्मारकासाठी पंतप्रधान समुद्रात गेले होते, काय झालं त्या स्मारकांचं? आमच्या महाराजांचे खरं स्मारक हे त्यांनी उभारलेले गड-किल्ले आहेत, त्यांची नीट निगा राखणे हेच खरं महाराजांचे स्मारक ठरेल
- जातीवर मत मागण्यासाठी ते आरक्षणाचं आमिष दाखवत आहे
- काय झालं मेक इन इंडियाचं? कोणाला कामं मिळाली? काय झालं स्टार्ट अप इंडियाचं? स्मार्ट सिटी मध्ये सोलापूर होतं, काय झालं सोलापूरच? नाशिक मध्ये आमच्या सत्ताकाळात आम्ही उद्योगपतींच्या सहकाऱ्याने आम्ही जे उभारलं ते भारतीय जनता पक्ष स्मार्ट सिटीच्या नावावर खपवतंय
- नरेंद्र मोदींवर देशातील लोकांनी भरभरून प्रेम केलं, त्यांना प्रचंड बहुमत दिलं पण मोदींनी देशाला, जनतेला फसवलं. आज ते शहीद जवानांच्या नावावर मतं मागत फिरत आहेत.
- हरीलसालच्या डिजिटल गावाचं वास्तव आम्ही समोर आणल त्यावर मुख्यमंत्र्यांनी गाव डिजिटल झालंच आहे असा दावा केला. एका वृत्तवाहिनीने वास्तव समोर आणले. डिजिटल गावात ४ जी टॉवर नाही,एटीएम मशीन बंद आहे, जाहिरातीतील लाभार्थी मॉडेल रोजगाराच्या शोधात गाव सोडून निघून गेलाय.
- हरिसाल डिजिटल गावाच्या जाहिरातीमधील मॉडेल मुलगा स्टेजवर केला हजर
- हरिसाल डिजिटल गावाची जाहिरात पण हरिसाल गावात शूट केली नाही. का खोटं बोलताय मुख्यमंत्री?
- राज ठाकरे हरिसालला गेलेच नाहीत असं मुख्यमंत्री म्हणाले. मग ते म्हणाले होते मी महाराष्ट्रात १ लाख वीस हजार विहिरी बांधल्या, कुठल्या विहिरीवर तुम्ही पाणी काढायला गेला होतात? आज जवळपास २७००० गावं दुष्काळग्रस्त जाहीर झाली आहेत, मराठवाड्यातील लोकं दुष्काळामुळे ग्रासून वणवण फिरत आहेत.
- नरेंद्र मोदी नव-मतदारांना आवाहन करत आहेत की पुलवामाच्या शहिदांच्या स्मृतीसाठी मतं द्या. शहिदांच्या कुटुंबीयांकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही. ह्याच जवानांच्या बद्दल मोदी म्हणाले होते की सैनिकांपेक्षा व्यापारी हा जास्त शूर असतो.
- अर्थकारणापासून ते सत्ताकारणांपर्यंत सगळ्या गोष्टी फक्त ८ ते १० लोकांच्या हातात राहतील अशी व्यवस्था नरेंद्र मोदी आणि अमित शाह ह्यांना भारतात हवी आहे.आणि म्हणूनच ह्या दोघांना राजकीय क्षितिजावरून हटवलं पाहिजे. इतकंच नव्हे तर ह्यांना मदत करणाऱ्यांना देखील मतदान करू नका
- प्रत्येक भारतीय जनतेच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच आश्वासन हा चुनावी जुमला आहे असं अमित शाह म्हणाले. तुम्हाला मूर्ख बनवलंय
- हिलटरने ज्याप्रमाणे जर्मनीमध्ये केलं त्याप्रमाणेच या लोकांना देशाला न्यायचं आहे. त्यांना लोकशाही संपवायची आहे, सर्व संस्था मोडायच्या आहेत
- नोटबंदीमुळे फक्त सोलापुरात यंत्रमाग कामगार ४० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या.
- मोदींनी उद्योगपतींची जवळपास २.५ लाख कोटींची कर्ज माफ केली, लाज नाही वाटत धनदांडग्यांसाठी देशाला लुटताना
- नवाज शरीफना लव्ह लेटर पाठवू नका असं २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला बोलणारे मोदी पंतप्रधान झाल्यावर नवाज शरीफना शपथविधीला बोलावू लागले, त्यांना पाकिस्तानात जाऊन केक भरवू लागले. काय वाटलं असेल शहीद जवानांच्या कुटुंबियांना?