उत्तर प्रदेशातील सुलतानपूर लोकसभा मतदारसंघाची जागा यंदा देशभरातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहे. या जागेवरून वरुण गांधींच्याऐवजी केंद्रीय महिला-बालविकास मंत्री मनेका गांधी यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. भाजपाला आणि मनेकांसह वरुण यांना ही जागा जिंकण्याचा विश्वास आहे; तथापि, आतापर्यंतचा इतिहास काही वेगळंच सांगणारा आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वीपर्यंत या जागेवरून एकदाही महिला उमेदवार विजयी झालेली नाही. त्यामुळेच मनेकांची वाट वाटते तितकी सोपी नाही. तशातच यंदा सपा-बसपा आघाडी आणि कॉंग्रेस हे पक्ष रिंगणात असल्यामुळे इथे तिरंगी लढत होणार आहे. कॉंग्रेसतर्फे डॉ. संजय सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
1998 मध्ये पहिल्यांदा समाजवादी पक्षाने या जागेवरून माजी मुख्यमंत्री हेमवतीनंदन बहुगुणा यांच्या कन्या आणि योगी सरकारमध्ये सध्या मंत्री असणाऱ्या रिटा बहुगुणा जोशी यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यावेळी त्यांना भाजपाच्या जी. व्ही. राय यांनी पराभूत केले. एक वर्षांनंतर झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये कॉंग्रेसने गांधी परिवाराच्या निकटवर्तीय राहिलेल्या दीपा कौल यांना उमेदवारी दिली. पण त्या केवळ पराभूतच झाल्या नाहीत, तर निकालांमध्ये त्या थेट चौथ्या स्थानावर गेल्याचे दिसून आले. या निवडणुकीत बसपाचे जयभद्र सिंह विजयी झाले. 2004 मध्ये भाजपाने डॉ. वीणा पांडेय यांना मैदानात उतरवले. मात्र, त्यांचाही दारुण पराभव झाला. त्याही चौथ्या स्थानावर गेल्या. या निवडणुकीत पुन्हा बसपाचाच उमेदवार विजयी झाला. मोहम्मद ताहीर खान यांना मतदारांनी पसंतीचा कौल दिला. 2009 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये या जागेवरून कोणत्याच पक्षाने महिला उमेदवार रिंगणात उतरवण्याची जोखीम पत्करली नाही. 2014 मध्ये कॉंग्रेसने डॉ. संजय सिंह यांची पत्नी अमिता सिंह यांना उमेदवारी दिली. मात्र त्याही सुलतानपूरची “परंपरा’ मोडू शकल्या नाहीत.
भाजपाच्या वरुण गांधींनी त्यांचा पराभव केला. यंदाच्या निवडणुकांसाठी वरुण गांधी यांना पिलभितची जागा देण्याचा आग्रह खुद्द मनेकांनीच धरला. याचे कारण सुलतानपूरमध्ये वरुण यांच्याविषयी नाराजी होती. वरुण यांचा मतदारसंघ बदली करताना त्यांनी स्वतःसाठी हरियाणातील कर्नाल मतदारसंघ मागितला होता. वरुण यांना पिलभितची जागा देण्यात आली. मात्र, मनेकांना कर्नालऐवजी सुलतानपूर देण्यात आले. यंदा या जागेवरून सपा-बसपा आघाडीने माजी आमदार चंद्रभद्र सिंह यांना रिंगणात उतरवले आहे. संजय सिंह आणि चंद्रभद्र सिंह यांना पराभव झाल्यास सुलतानपूरमध्ये इतिहास घडणार आहे.