शेवगाव: तालुक्यातील हिंगणगाव येथील प्रेमीयुगलाने गावातील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार काल रविवारी (दि.12) रात्री विहीर मालक संपत मिसाळ यांच्या लक्षात आली. आज सोमवारी (दि.13) पोलीस व ग्रामस्थांनी क्रेनच्या साह्याने कुजलेल्या स्थितीतील दोन्ही मृतदेह अथक प्रयत्नानंतर बाहेर काढले. यावेळी परिसरात अत्यंत दुर्गंधी पसरली होती. मुलीच्या घरचे औरंगाबाद येथे, तर मुलाच्या घरचे नाशिकला शवविच्छेदन करण्यावर अडून बसल्याने रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते. तसेच दोघांच्या एकमेकाविरुद्ध तक्रारी असून, उशिरापर्यंत या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, हिंगणगा येथील एका महिलेने गुरुवारी आपली 16 वर्षांची मुलगी राहत्या घरातून प्रार्तविधीला जाते, असे सांगून घरातून निघून गेली होती. त्यानंतर ती पुन्हा घरी आलीच नाही. त्यांनी गावातील व बाहेर गावच्या नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती सापडली नाही. शेजारीच राहणारा गावातील राजेंद्र परमेश्वर शिंदे (वय 25) हा घरी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे मुलीच्या आईने गुरुवारी रात्री शेवगाव पोलीस ठाण्यात शिंदे याच्याविरुद्ध मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. काल रात्री परीसरातील मिसाळ यांच्या विहीरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले. सोमवारी ग्रामस्थ व पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने दोन्ही मृतदेह दुपारी 12 वाजता बाहेर काढले. दोन्ही मृतदेह कुजून मोठी दुर्गंधी सुटलेली होती. याबाबत आता दोन्ही कुटुंबांच्या वतीने एकमेकांवर आरोप करण्यात येत आहेत.
घटनास्थळी उपविभागीय अधिकारी मंदार जवळे यांनी भेट दिली. तर सहायक पोलीस निरीक्षक नितीन मगर यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला. या संदर्भात युवक युवतीचे प्रेमसंबंध होते. मात्र घरच्यांचा विरोध असल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. सहायक पोलीस निरीक्षक मगर तपास करीत आहेत.