मान्सूनपूर्व तयारी बैठक ः पूर नियंत्रण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक
पावसाळ्यातील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे पाटबंधारे विभागाला आदेश
…तरीही जबाबदारी पार पाडा
पावसाळा हंगाम हा जरी 15 ऑक्टोबरपर्यंत असला, तरी या कालावधीमध्ये धरणे ही शक्यतो पूर्ण भरलेली असतात व त्यानंतर पाऊस आल्यास पाण्याचा विसर्ग हा वाढू शकतो. त्यामुळे 15 ऑक्टोबर तारीख झाली की आपले कर्तव्य संपले असे न मानता दि.30 नोव्हेंबरपर्यंत जागरूक राहून जबाबदारी पार पाडावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून पाटबंधारे विभागाला देण्यात आल्या आहेत.
पुणे, दि. 12- जिल्ह्यातील सर्व धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून पाटबंधारे विभागाला देण्यात आले आहेत. त्यामुळे हे काम तातडीने सुरू केले जाण्याची शक्यता आहे.
मान्सूनपूर्व तयारी बैठक, पूर नियंत्रण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात मोठी सुमारे 24 धरणे आहेत. मोठ्या क्षमतेच्या या धरणांचे स्ट्रकचरल ऑडिट पावसाळ्यापूर्वी करून घेण्यात यावे. धरणांच्या गळतीबाबत पावसाळ्यापूर्वी कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानंतर करावयाची उपाययोजनांबाबत आराखडा निश्चित करण्यात यावा. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत त्वरित लोकांबा सूचना करणे, त्याचबरोबर जिल्हा व तालुका नियंयण कक्षाला माहिती कळविणे. अधिकृत सक्षम अधिकाऱ्यांच्या मदतीने पाणी सोडावयाचे की नाही याबाबत निर्णय घेणे, मोठ्या क्षमतेच्या धरणांच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी यांची नेमणूक करणे आणि नियंत्रणाचे कार्य करणे.
ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, अशा ठिकाणी शोध व बचाव करणयसाठी पाणी उपसण्याकरिता पंप, जनरेटर्स, बुलडोझर्स, बोट आदींची सोय करणे. पूररेषा मार्क करणे, धरणांच्या खालील बाजूस असलेल्या पुरामुळे संभाव्य बाधित गावांची यादी तयार करून जिल्हा नियंत्रण कक्षास देण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत. धरणातून विसर्ग केल्यानंतर यंत्रणेला सज्ज होण्यासाठी सुमारे 2 तासांचा अवधी असतो. त्याप्रमाणे संबधित महानगरपालिका व इतर यंत्रणेने दक्षता घ्यावी. तसेच पाटबंधारे विभागातील पूरनियंत्रण कक्ष हा दि. 1 जूनपासून कार्यान्वित होणार असल्याचे पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.