पुणे – उत्तर भारतात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र विरून गेल्यामुळे कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाने उघडीप दिली आहे. पुढील चार ते पाच दिवस पावसामध्ये खंड असण्याची शक्यता आहे. दरम्यान, दि. 13 आणि 14 जुलै रोजी कोकण-गोव्यात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडतील, अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
गुरुवारपासून राज्यात पावसाने उघडीप दिली असून, अनेक दिवसानंतर शुक्रवारी सूर्यदर्शन झाले. दरम्यान, नेहमीप्रमाणे पाठ फिरविणाऱ्या मान्सूनने गुरूवारी (दि. 11) मराठवाड्यातील बहुतांश भागात हजेरी लावली. गगनबावडा आणि वेंगुर्ला येथे सर्वाधिक 160 मिमी पावसाची नोंद झाली. चिपळूण, म्हापसा येथे 150, पणजी आणि त्र्यंबकेश्वर येथे 140, मडगाव, राजापूरमध्ये 130, महाबळेश्वर, दोडामार्ग, फोंडा परिसरात प्रत्येकी 120, वैभववाडी, श्रीवर्धन, सावंतवाडी येथे 110 मिमी पावसाची नोंद झाली. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला असून, खडकवासला धरणातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली
आहे.