नव्या रालोआ सरकारवरील गुंतवणूकदारांचा विश्वास कायम
मुंबई – गेल्या पंधरा दिवसांत एकतर्फी मोठी खरेदी झाल्यामुळे शेअरबाजार निर्देशांक सध्या विक्रमी पातळीवर आहेत. निर्देशांक आवश्यकतेपेक्षा जास्त वाढले आहेत असे बोलले जात असले तरी देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांनी खरेदीत चालूच ठेवल्यामुळे निर्देशांक सोमवारी वाढले.
सोमवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 248 अंकांनी म्हणजे 0.63 टक्क्यांनी वाढून 39,683 अंकांवर बंद झाला. तत्पूर्वी सेन्सेक्स 400 अंकांनी वाढला होता. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 80 अंकांनी वाढून 11,924 अंकावर बंद झाला. मुख्य निर्देशांकापेक्षा मिडकॅप आणि स्मॉलकॅप जास्त वाढले.
सोमवारी हे निर्देशांक 1.27 टक्क्यांनी वाढले होते. दरम्यान, भारतीय शेअरबाजारातील सकारात्मक वातावरण पाहून परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी 2026 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 195 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. रुपयाचे मूल्य आज कमी झाले. त्याचबरोबर क्रूड तेलाचे भाव 67.50 प्रति पिंप या पातळीपर्यंत खाली आले आहेत.
या घडामोडींची कारणमीमांसा करताना शेअर खानच्या सल्लागार विभागाचे प्रमुख हेमांग जानी यांनी सांगितले की, निर्देशांक उच्च पातळीवर असूनही गुंतवणूकदारांचा उत्साह कमी झालेला नाही. हे सरकार उद्योगासाठी व अर्थव्यवस्थेसाठी वेगात उपाययोजना करेल असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदाराबरोबरच देशातील गुंतवणूकदारही यात सामील होत आहेत.
दोन दिवसांत 3.86 लाख कोटी रुपयांची वाढ
निर्देशांकांत वाढ असल्यामुळे होत असल्यामुळे गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढत आहे. शुक्रवारी आणि सोमवारी सेन्सेक्स 871 अंकांनी वाढला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे गुंतवणुकीचे मूल्य या दोन दिवसांत 3.86 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे.गुरुवारी शेअरबाजारावर नोंदलेल्या सर्व कंपन्यांचे बाजार मूल्य 1,50,25,175 कोटी रुपये होते. ते सोमवार अखेर 1,54,11,395 कोटी रुपये इतके झाले आहे. 23 मे रोजी सेन्सेक्स 40,124 अंकापर्यंत वाढला होता.