एनबीएफसीसाठी ठोस उपायांचा अभाव
मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने सलग तिसऱ्या वेळी रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केली. त्यामुळे रेपो दर नऊ वर्षाच्या नीचांकावर आहे. रिझर्व्ह बॅंकेने भांडवल सुलभता वाढविण्यासाठी त्याचबरोबर बिगर बॅंकिंग वित्तीय संस्था समोरील पेच कमी करण्यासाठीही औपचारिक असे काही केले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या गुंतवणूकदारांनी विक्री केल्यामुळे शेअरबाजाराचे निर्देशांक कोसळले.
बाजार बंद होताना गुरुवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 553 अंकांनी म्हणजे 1.38 टक्क्यांनी कमी होऊन 39,529 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 177 अंकांनी कमी होऊन 11,843 अंकांवर बंद झाला.
बॅंकेने व्याजदरात कपात केली असली महागाई वाढण्याचे संकेत दिले आहेत. तसेच विकासदर अंदाज कमी करून तो 7 टक्के केला आहे. या कारणामुळे कंपन्यांचा नफा कमी होण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटते. याबाबत बोलताना एव्हीपी इक्विटी रिसर्च संस्थेचे आनंद राठी यांनी सांगितले की, एनबीएफसीमुळे मुळातच विकासदर कमी झाला असताना बॅंकेने हा प्रश्न न सोडवता केवळ रेपोदरात कपात केली आहे.
आज एनबीएफसी कंपन्यांबरोबरच भांडवली वस्तू, ऊर्जा आणि बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री झाली. त्याचबरोबर आजच्या विक्रीचा ग्राहक वस्तू क्षेत्रालाही फटका बसला. मुख्य निर्देशांकाबरोबरच गुरुवारी मिडकॅप व स्मॉल कॅप 1.77 टक्क्यापर्यंत कमी झाले.