लेंडी नाला, कापसे बंधारा भरण्याची मागणी
श्रीगोंदा – कुकडीचे सुरू असलेल्या आवर्तनातून श्रीगोंदेकरांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. ही प्रमुख मागणी करीत येथील शेतकऱ्यांनी आज तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
तहसीलदार महेंद्र माळी यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. लिंक कालवा 132 ला पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती यावेळी तहसीलदार माळी यांनी शेतकऱ्यांना दिली.
सरस्वती नदीवरून कापसे बंधारा भरण्यात यावा तर शहराला लाभदायक ठरणारा लेंडी नाला डीवाय 10 वरून भरण्यात यावा, ही आग्रही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. दुष्काळाची धग दूर करण्यासाठी कुकडीचे आवर्तन महत्वाचे असून हे पाणी मिळाले नाही तर भीषण परिस्थिती निर्माण होईल,असे मत शेतकऱ्यांनी यावेळी मांडले. या आंदोलनात माजी उपनगराध्यक्ष राजू गोरे, सरस्वती नदी सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष गोरख आळेकर, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अरविंद कापसे, प्रशांत गोरे, डॉ. चंद्रकांत कोथिंबीरे, माजी सरपंच विलास रसाळ, बबलू जकाते, राजू, जकाते, सलीम जकाते, रमेश पारे, विजय बोरुडे, किरण खेतमाळीस, बाळासाहेब राऊत, शहाजी शिंदे, माधव बनसुडे, गणेश कोथिंबीरे, विजय शेंडगे, श्याम जरे आदी सहभागी झाले होते.
श्रीगोंद्याला पाण्यासाठी नेहमीच संघर्ष करावे लागते. आमच्या हक्काचे पाणी पळविले जाते. पालकमंत्री प्रा. राम शिंदे हे संपूर्ण जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. याचा त्यांना विसर पडला आहे. त्यांच्याकडून श्रीगोंदा तालुक्याला नेहमीच सवतीची वागणून दिली जाते.
राजू गोरे माजी उपनगराध्यक्ष, श्रीगोंदा