खा. उदयनराजे भोसले यांचा आरोप
उंब्रज – मिशीला पीळ देत आपण काय बोलतो याचे भान न ठेवणाऱ्या व माथाडी कामगारांना पिळून टाकून तरुण वर्गात नैराश्य निर्माण करणारे नरेंद्र पाटील हे बेताल वक्तव्य करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपत्राचे लोकसभेचे उमेदवार श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांनी केला.
पाल, ता. कराड येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ.आनंदराव पाटील, देवराज पाटील, बाळासाहेब पाटील-सोळस्कर, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
उदयनराजे पुढे म्हणाले, लोकशाहीत जात-पात सर्वसमान आहे.
नरेंद्र पाटील यांनी आपण काय बोलतो याचे भान ठेवावे. आम्ही काय सुपरमॅन नाही. खरे बोलताना लक्षात ठेवावे लागत नाही मात्र खोटे बोलताना लाज वाटली पाहिजे असा चिमटा ही त्यांनी काढला. आम्ही स्वकर्तुत्वाने ओळख निर्माण केली आहे. नरेंद्र पाटील नावाचा बार फुसका आहे. भाजप सरकारने आतापर्यंत अन्यायकारक निर्णय घेतले असून सर्वसामान्य जनता त्यात भरडली गेली आहे. धोरण आखण्या ऐवजी शेतकऱ्यांचे तोरण बांधण्याचे काम भाजप सरकारने केले असा आरोप करीत देशाला महासत्तेकडे नेण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 23 मे नंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाही. दुसऱ्या कुठल्याही पक्षाला पुढे करुन पंतप्रधान होता येणार नाही. भाजपचे 160 च्यावर खासदार निवडून येणार नाहीत. भाजप शिवसेना हा जातीयवादी पक्ष आहे. मोदी हे हुकूमशाह बनले आहेत. गुजरात मॉडेल, अच्छे दिन, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देईन ही आश्वासने खोटी ठरली आहेत. भ्रष्ट भाजप सरकार देशात इतिहासात झाले नाही. सरकार बदलले की भाजपच्या नेत्यांचा लेखाजोखा बाहेर निघणार आहे.
बाळासाहेब पाटील म्हणाले, स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने आलो आहोत. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा ही मागणी असताना भाजप सरकार बोलायला तयार नाही. देशात परिवर्तन घडविणे गरजेचे आहे. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी उदयनराजे भोसले यांना मतदान करून निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.