पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यंदाही दरवर्षीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 82.82 टक्के लागला आहे. तर मुलांचा निकाल 72.18 % लागला. परंतु, यंदा राज्याचा निकाल गत वर्षीच्या तुलनेत १२.२१ टक्क्याने घटला. यंदा राज्याचा निकाल ७७.१० टक्के लागला आहे.
एकूण १६ लाख ३९ हजार ८६२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १२ लाख ४७ हजार ९०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नवीन अभ्यासक्रम, नवीन पॅटर्न आणि काही विषयांचे तोंडी परीक्षा बंद या कारणाने कमी राज्याचा निकाल कमी लागल्याचा अंदाज शकुंतला काळे यांनी व्यक्त केला आहे. अन्य केंद्रीय बोर्डाचा निकाल 90 टक्क्यांच्या पुढे लागला आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्र बोर्डाच्या मुलांना विशेषतः मोठ्या शहरामध्ये अकरावी प्रवेशासाठी गुणवत्तेचा कस लागणार आहे.
दरम्यान, ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुडपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल. यासाठी त्या अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठी 10 ते 19 जून, तर छायाप्रतीसाठी दि. 10 ते 29 जूनपर्यंत शुल्क भरून अर्ज करण्याची मुदत आहे, असे राज्य शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.