मुंबई – लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या पराभवानंतर महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. संपूर्ण देशात लोकसभेत कॉंग्रेसला केवळ 52 जागा मिळाल्या आहेत. खुद्द कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिला आहे. देशातील अनेक नेते एकापाठोपाठ एक राजीनामे देत आहेत. उत्तर प्रदेशचे प्रभारी राज बब्बर यांनी राजीनामा दिल्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी देखील आज राजीनामा दिला आहे. यासंदर्भातील खुद्द अशोक चव्हाण यांनीच दिली आहे.
या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मी राजीनामा पाठवला असून आता कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी फेरबदलासंदर्भातील निर्णय घ्यायचा आहे. यासंदर्भातील निर्णय घेण्याचा त्यांना सर्वाधिकार आहेत. तसेच मी लवकरच राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राजीनामा देण्याआधी अशोक चव्हाण ट्विट करून म्हणाले होते की, राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली होती. पण कॉंग्रेसला राज्यात हवे तसे निकाल मिळाले नाहीत. मी महाराष्ट्रातील या पराभवाची जबाबदारी घेत राजीनामा देण्यास तयार आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसची कामगिरी प्रचंड खराब झाली. 2014च्या निवडणुकीत कॉंग्रेसला 2 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यात घट झाली. कॉंग्रेसला राज्यात फक्त एक जागा मिळाली आहे. खुद्द अशोक चव्हाण यांचा देखील पराभव झाला आहे. चंद्रपूरमधून सुरेश धनोडकर हे एकमेव कॉंग्रेसचे खासदार आहेत. राज्यात भाजप-शिवसेना युतीला 48 पैकी 41 जागांवर यश मिळाले आहे. अशोक चव्हाण यांनी हे देखील मान्य केली की प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या 9 ते 10 जागांचे नुकसान केले.