नवी दिल्ली – स्पॉट फिक्सिंग प्रकरणात वेगवान गोलंदाज श्रीसंतला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. याचिकेवरील सुनावणी करताना आज न्यायालयाने आजीवन बंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच बीसीसीआयला तीन महिन्याच्या आत याप्रकरणावर निर्णय घेण्याचा निर्देश दिला आहे.
न्यायाधीश अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी केली. यावेळी बीसीसीआयला शिक्षा देण्याचा अधिकार नसल्याचा श्रीसंतचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला. व बीसीसीआयला अनुशासनात्मक कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. तसेच श्रीसंतला देण्यात आलेली शिक्षा जास्त असून बीसीसीआयने तीन महिन्याच्या आत याप्रकरणी निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने म्हंटले आहे.
A bench of the Supreme Court, headed by Justice Ashok Bhushan, asked the BCCI to decide afresh on the point of quantum of punishment given to S Sreesanth https://t.co/tYPkyXTX59
— ANI (@ANI) March 15, 2019
दरम्यान, श्रीसंत याच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप ठेवून बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदी घातली होती. केरळ उच्च न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी त्याच्यावरील बंदी उठवली होती. त्यानंतर बीसीसीआयने श्रीसंतच्या आजीवन क्रिकेट खेळण्यावरील बंदी हटवण्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते. बीसीसीआयच्या आव्हानानंतर केरळ उच्च न्यायालयाने बंदी कायम ठेवली होती. श्रीसंतने केरळच्या उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आत बीसीसीआयला तीन महिन्यात निर्णय द्यायचा आहे. बीसीसीआय काय निर्णय देते याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून आहे.