मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रविवार रोजी देशवासियांना दीपोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. सर्व स्थरांतून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला मात्र, यावेळी मेणबत्ती, मोबाइल लाइट तसेच पणत्या लावा, असे सांगितल्यानंतरही काही हौशी लोकांनी चक्क फटाके वाजविले. या कृतीवर देशातील अनेक खेळाडू संतप्त झाले आहेत. फटाके वाजविणाऱ्यांवर टीका करताना साही माणसे बोट धरायला सांगितले की, पूर्ण हात धरतात, अशा शब्दात खेळाडूंनी या कृतीवर ताशेरे ओढले आहेत.
देशातील नागरिकांना करोनाबाबत जागृत करण्यासाठी तसेच त्यांना सकारात्मक बनविण्यासाठी 5 एप्रिलरोजी नागरिकांनी आपापल्या घरातील विजेवरील दिवे मालवून तेल दिवे, मेणबत्ती तसेच मोबाइलमधील बॅटरीचे दिवे लावा, असे आवाहन मोदी यांनी केले होते. यावेळी काही अती हौशी मंडळींनी चक्क फटाक्यांची आतषबाजीच केली. घरातच राहा, रस्त्यांवर उतरु नका या हेतूलाच त्यामुळे हरताळ फासले गेले. यावर अनेक स्तरांतून टीका होत आहे. खासदार व माजी कसोटीपटू गौतम गंभीर, हरभजनसिंग, युवराजसिंग यांच्यासह अनेक क्रिकेटपटू तसेच अन्य क्रीडापटूंनी या लोकांवर ताशेरे ओढले आहेत.
करोनाशी मुकाबला करण्यासाठी आपण एकत्र आहोत. संपूर्ण देश सकारात्मक होत आहे असा संदेश यातून मिळावा व ज्या लोकांना याचा धोका आहे अशा व्यक्तींची भीती दूर व्हावी हा हेतू होता. मात्र, देशात अनेक लोकांचा मुर्खपणा यावेळी दिसून आला. आपण कोणता सामना जिंकला किंवा लढाई जिंकल्याच्या थाटात फटाके वाजवले गेले यामुळे हा हेतू बदनाम झाला, असे मत गंभीरने व्यक्त केले आहे.
फटाके कसे मिळाले – हरभजन
देशात लॉकडाऊन आहे, अत्यावश्यक सेवेचा अपवाद वगळता बाकी सर्व बंद आहे. मग अशा स्थितीत लोकांना फटाके कसे मिळाले, त्याची विक्री कोणी केली याचा शोध घेतला जावा. करोनापासून आपण निश्चितच सुरक्षित राहु पण कदाचित या मूर्ख लोकांमुळे नुकसान होईल, अशी टीका क्रिकेटपटू हरभजनसिंग याने केली आहे.