खटाव – पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेला 8 एप्रिल रोजी सुरुवात झाल्यानंतर खटाव तालुक्यातील गावा-गावात श्रमदानाचं तुफान आलं आहे. 22 मे स्पर्धेची अंतिम तारीख असून 45 दिवस सुरू असलेल्या श्रमदानामुळे तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी गावागावातून लोक आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत.
जलसंधारणाचे प्रशिक्षण घेतलेल्या गावातील प्रमुख पाच लोकांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली गावागावात श्रमदानाच्या माध्यमातून ऐन उन्हात जलसंधारणाचे विविध कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. मानवीय श्रमदानाबरोबरच यंत्राच्या साहाय्याने देखील जलसंधारणाच्या महत्त्वपूर्ण कामे मार्गी लावली जाणार आहेत. पडणाऱ्या पावसाचे पाण्याची साठवण क्षमता विकसित करण्याचे काम गावकऱ्यांनी मनावरच घेतला आहे.
स्पर्धेसाठी भागातील विविध संस्था, विविध साखर कारखाने, यांच्यासह विविध राजकीय नेते, सामाजिक संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय, शासकीय अधिकाऱ्यांनी श्रमदानात आपला सहभाग नोंदवून गावातील लोकांना प्रोत्साहित करण्याबरोबरच तालुका दुष्काळमुक्त करण्याच्या मोहिमेत आपला सहभाग नोंदवल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील 65 गावांनी जलसंधारणाच्या कामात सहभाग घेतला असून 28 गावांनी मध्यरात्री 12 ला कामाचा शुभारंभ केला.
यामध्ये मांजरवाडी, मोळ, डिस्कळ, गारवडी, चिंचणी, काळेवाडी, ललगुण, शिंदेवाडी, नागनाथवाडी, कलेढोण, तरसवाडी, गारुडी, मुळीकवाडी, पाचवड, पडळ, ढोकळवाडी, जाखणगाव, रणसिंगवाडी, राजापूर, वेठणे, नवलेवाडी, नागाचे कुमठे, बुध, खातगुण, कटगुण, अंभेरी, आमलेवाडी, गादेवाडी, रेवलकर वाडी, भोसरे, वडखळ, रामोशी वाडी, नायकाचीवाडी, कातळगेवाडी, कोकराळे, वरुड, वडी, गोपूज, मांडवे, दरुज, लोणी, गिरीजा शंकरवाडी,डांबेवाडी, होळीचा गाव, विखळे, शेणवडी, नडवळ, भुरकवडी, वर्धनगड, आदी गावांमध्ये कामे वेगाने सुरू आहेत.