-आनंद गावरस्कर
क्रिकेट हा खेळ जरी उदयास युरोपात आला असला तरी त्याचा सर्वात मोठा चाहता वर्ग हा भारतीय उपखंडात म्हणजेच आशियाखंडात आहे. त्यामुळे यंदा विश्वचषकासाठी पात्र ठरलेले पाच संघ हे आशिया खंडातील आहेत. असे असले तरी कामगिरीची तुलना केल्यास यंदा आशियाखंडाची मदार ही भारता व्यतिरीक्त बांगलादेश आणि अफगाणिस्तानवर अवलंबून असल्याचे दिसुन येते आहे. त्याचे कारण म्हणजे पाकिस्तान आणि श्रीलंका संघांनी सलामीच्या सामन्यांमध्ये केलेली निराशाजनक कामगिरी ही आहे.
विश्वचषकाच्या सुरूवातीपासुन आशियातील भारतीय संघा व्यतिरीक्त बलाढ्य समजल्या जाणाऱ्या श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी केलेल्या सुमार कामगिरीनंतर आशिया खंडातील क्रिकेटची धुरा आता भारतीय संघाच्या ताब्यात आली असल्याचे प्रकर्षाने जाणवते आहे.
विश्वचषक स्पर्धेत आशिया खंडातील इतर संघांपैकी दुबळ्या समजल्या जाणाऱ्या अफगाणिस्तान आणि बांगलादेशच्या संघांनी आपापल्या सलामीच्या सामन्यात चांगली कामगिरी करत सर्वंची वाहवाह मिळवली असुन एकवेळ विश्वचषक स्पर्धेवर आपले नाव कोरणाऱ्या श्रीलंका आणि पाकिस्तान या संघांनी खराब कामगिरी केल्याने त्यांचे संघ इतर चाहत्यांबरोबरच त्यांच्या पाठिराख्यांकडूनही ट्रोल होत आहेत.
गेल्या काही काळापासुन अफगाणिस्तान आणि बांगलादेश या नवख्या संघांनी आपल्या कामगिरीत कमालिची सुधारणा केली आहे. त्यांचे संघ केवळ एक दोन फलंदाज अथवा गोलंदाज यांच्यावर अवलंबुन नसून त्यांच्याकडे प्रतिभावान खेळाडूंचा भरणा आहे. मात्र, याच्याच उलट पाकिस्तान आणि श्रीलंका संघाची सध्या परिस्थीती झालेली आहे. त्यांच्याकडे प्रतिभावान खेळाडू आहेत मात्र त्यांना त्यांची प्रतिभा आपल्या कामगिरीतून सर्वांसमोर आणन्यात अडचणींचा सामना करावा लागतो आहे.
पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांची सध्याची परिस्थीती वेस्ट इंडिजच्या संघासारखी होताना दिसून येत आहे. एकेकाळी प्रतिभावान खेळाडूंचा भरणा असनाऱ्या या संघांनी स्थानीक क्रिकेट कडे दुर्लक्ष करत संघासाठी दुसरी फळीच निर्माण केली नाही. त्यामुळे संघातील पहिल्याफळीतील खेळाडूंनी निवृत्ती स्विकारल्यानंतर संघ अडचणीत सापडले आहेत. त्यातच बांगलादेश आणि अफगाणिस्तानने आपल्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांवर अधिक भर दिल्याने ते आगामी काळात क्रिकेट विश्वात आपली शमक कायम करु शकतात यात शंका नाही.