नातवाची मागणी: कॉंग्रेसकडून नेहरू-गांधी परिवाराबाहेरील नेते दुर्लक्षित
हैदराबाद- माजी पंतप्रधान दिवंगत पी.व्ही.नरसिंह राव यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून त्यांचे नातू एन.व्ही.सुभाष यांनी गुरूवारी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जी.चिन्ना रेड्डी यांच्यावर पलटवार केला. तसेच, राव यांच्यावरील अन्यायाबद्दल सोनिया आणि राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही केली.
राव यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात गांधी परिवाराला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रेड्डी यांनी केला. त्यावर सुभाष यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सविस्तर प्रतिक्रिया दिली. रेड्डी यांचा आरोप खोटा आणि निषेधार्ह आहे. राव हे गांधी परिवारासाठी विश्वासू नेते होते. राव यांनी कॉंग्रेसशी संबंधित आणि सरकारशी संबंधित घडामोडींची माहिती नेहमीच सोनियांना दिली. त्यासाठी त्यांनी अनेकदा स्वत:हून सोनियांची भेट घेतली.
मात्र, त्यावेळी सोनियांना राजकारणात रस नव्हता. मुलांनी राजकारणात सक्रिय व्हावे असेही त्यांना वाटत नव्हते. त्यामुळे गांधी कुटूंबाला दुर्लक्षित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट, कॉंग्रेसने नेहमीच नेहरू-गांधी परिवाराबाहेरील नेत्यांना दुर्लक्षित केले. निधनानंतर राव यांचे पार्थिव दिल्लीतील कॉंग्रेस मुख्यालयात नेऊ देण्यास परवानगी दिली गेली नाही. सर्व माजी पंतप्रधानांची स्मारके दिल्लीत उभारण्यात आली.
केवळ राव यांच्याबाबत तसे घडले नाही. त्यातूून त्यांच्याविषयीचा वेगळा दृष्टीकोन उघड होतो, असे टीकास्त्रही सुभाष यांनी सोडले. सुभाष यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. आता त्यांच्याकडे तेलंगण भाजपच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी आहे.