137 छावण्या सुरू, 5 लाख 86 हजार नागरिकांना 260 टॅंकरने पाणीपुरवठा
सोलापूर, दि. 13 (प्रतिनिधी) – पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळाची सर्वाधिक झळ सोलापूर जिल्ह्याला बसत आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 224 गावांमध्ये 5 लाख 86 हजार लोकांना 260 टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जनावरांसाठी चार तालुक्यांत 137 चारा छावण्या सुरू केल्या आहेत. 83 हजार 603 जनावरे छावण्यांमध्ये आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
सोलापूर जिल्ह्यात बार्शी (2), करमाळा (11), मंगळवेढा (43) व सांगोला (81) अशा रीतीने सहा तालुक्यांत 137 चारा छावण्या सुरू केल्या आहेत. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, अक्कलकोट व माळशिरस या सहा तालुक्यांत अद्याप एकही चारा छावणी सुरू झालेली नाही.
माढा तालुक्यात 4 छावण्यांना मंजुरी दिली असली तरी अद्याप त्य सुरू झालेल्या नाहीत. मंगळवेढा तालुक्यातील छावण्यांमध्ये 23 हजार 275, तर सांगोला तालुक्यातील 81 छावण्यांमध्ये 53 हजार 606 जनावरे दाखल झाली आहेत.
भूजल सर्वेक्षण विभागाने ऑक्टोबर ते जून या कालावधीत जिल्ह्यातील 607 गावांना टंचाई निर्माण होण्याचा अहवाल दिला होता. त्यापैकी 224 गावांत टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
उजनी धरणाच्या शेजारी असलेल्या माढा तालुक्यातील 97 व करमाळा तालुक्यातील 88 गावांत टंचाई स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. उत्तर सोलापूर 8, दक्षिण सोलापूर 42, अक्कलकोट 66, बार्शी 75, मोहोळ 49, पंढरपूर 40, सांगोला 42, मंगळवेढा 22 व माळशिरस तालुक्यातील 78 गावांचा समावेश आहे.