पुणे – “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात संविधान, लोकशाही, सामाजिक न्याय शिल्लक राहीलेला नाही. देशातील समता, बंधुता आणि लोकशाही टिकवायची असेल तर मोदींचा पराभव करावाच लागेल. यंदाची निवडणूक भाजपविरूद्ध कॉंग्रेस नसून, भाजपविरूद्ध संपूर्ण देश अशी आहे,’ असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी सोमवारी व्यक्त केले.
पुणे लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ कॉंग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. मुणगेकर यांनी हे आवाहन केले. यावेळी विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, प्रा. रतनलाल सोनग्रा उपस्थित होते.
रोजगार, काळा पैसा, शेतीमालाला दीडपट हमीभाव यासारखी अनेक आश्वासने दिली. परंतू या आश्वासनांची पूर्तता तर दूरच उलट नोटबंदीमुळे चार कोटी रोजगार बुडाला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. धार्मिक आणि सामाजिक वाद घडवून देशात असुरक्षितता निर्माण करण्यात मात्र ते अव्वल ठरल्याचे डॉ. मुणगेकर म्हणाले.
वर्षाला 72 हजार रुपये देण्याचा निर्णय हा अत्यंत अभ्यास करून घेण्यात आला आहे. देशाचे वार्षिक उत्त्पन्न लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. जनतेला दारिद्य्र रेषेच्या वर आणण्यासाठी ही शेवटची संधी आहे असे राहुल गांधीनी या आधीच सांगितले होते. त्यामुळे जनतेच्याच विचारातून, सूचनांमधून बनवलेल्या या जाहिरनाम्याची कॉंग्रेसकडून साहजिकच पूर्तता होईल, असे डॉ. मुणगेकर म्हणाले.