सविंदणे – सविंदणे (ता. शिरूर) येथील ग्रामसेवक आशिष भागवत हे बऱ्याच दिवसांपासून ग्रामपंचायतीमध्ये फिरकलेच नाही. त्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे “सविंदणेत ग्रामसेवक दाखवा आणि बक्षीस मिळवा’ अशी उपहासात्मक टीका ग्रामस्थांतून होत आहे.
गावातील शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्लॅंट नादुरुस्त आहे. ठेकेदारांचे बिलाचे पैसेही अडकले आहेत. ग्रामसेवकांना कळवूनही ते दुर्लक्ष करीत आहेत. बऱ्याचवेळा त्यांचा फोन स्वीच ऑफ असतो. घराचा उतारा, विवाह नोंदणी दाखला, घरांच्या नोंदी व अनेक कामासाठी ग्रामसेवक हजर असणे आवश्यक असते; परंतु हे ग्रामसेवक महिनाभर ग्रामपंचायतीकडे फिरकले नाहीत. ग्रामसेवकाने सजाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक असताना हे पुण्याला राहतात. ग्रामसेवकाची त्वरीत बदली करावी; अन्यथा ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
ग्रामसेवक यांना वेळोवेळी फोन करूनही ते गावासाठी वेळ देत नाही. गावामध्ये येत नाही. याविषयी गटविकास आधिकारी यांना सांगितले आहे.
-वसंत पडवळ, सरपंच, सविंदणे
ग्रामसेवक आशीष भागवत यांना पाबळ येथे अतिरिक्त चार्ज दिला आहे. सविंदणे येथील नागरिकांच्या तक्रारीनुसार तेथे दुसरा ग्रामसेवक देण्यात येईल.
-संदीप जठार, गटविकास अधिकारी, शिरूर