पावसाळ्यात जीवितहानीचा धोका वाढला
फलटण – वाजेगाव येथील उघड्या व दुर्लक्षितपणामुळे धोकादायक असलेल्या पाटणकर डीपीला महावितरण अधिकारी व कर्मचारी यांच्या बेजबाबदार कामामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागली व या आगीमध्ये डीपी लगतची अनेक झाडे जळून गेली या ठिकाणी रहिवासी भाग नसल्याने मोठा अनर्थ टळला. उघड्या डीपीमुळे पावसाळ्याच्या सध्याच्या दिवसांत शहरातील व ग्रामीण भागातील उघड्या डीपींची समस्या अजूनही कायम आहे. पावसाळ्यामध्ये अशा डीपींतून शॉर्टसर्किट होऊन दुर्घटना होण्याची शक्यता असतानाही या महत्वाच्या बाबींकडे महावितरण साफ दुर्लक्ष करत आहे.
फलटण शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाळ्याच्या दिवसात या धोकादायक झालेल्या डीपींवर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. पावसाळ्याच्या दिवसांत उघड्या डीपींमुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. पावसाचे पाणी डीपीमध्ये जाऊ नये यासाठी खबरदारी घेऊन पावसाळ्यापूर्वी यावर ठोस कार्यवाही करणे अपेक्षित आहे. परंतु, महावितरणने याकडे दुर्लक्ष करत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला या डीपी असल्या तरी आजूबाजूस दाट नागरी वस्ती आहेत. पावसात या डीपींमध्ये पाणी गेल्यास किंवा सखल भागात पाणी साचून विद्यूतप्रवाह या पाण्यात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या भागातून कायमच नागरिकांची वर्दळ असल्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता वाढली आहे. काही वेळेस जास्त दाबाने वीज प्रवाह असल्यास डीपीजवळच्या विज वाहक तारांत स्पार्किंग होत असते. पावसाच्या दिवसांत तर अशा घटना नेहमीच पाहण्यास मिळतात. स्पार्किंगमुळे शॉर्टसर्किट होण्याची व आग ही लागण्याची शक्यता आहे. या संभाव्य प्रकारांची जाणीव महावितरणला असतानाही त्यांच्याकडून यावर काहीच कार्यवाही झालेली दिसत नाही. डीपी झाकण्यासाठी किंवा डीपीच्या भोवती संरक्षणासाठी उपाययोजना महावितरण अधिकारी यांच्याकडून काहीच उपाययोजना केल्या जात नाही.