अग्निशमन जवानांच्या सतर्कतेने 4 दुकाने वाचली
पिंपरी – पिंपरी येथील साई चौकातील मोबाईल ऍक्सेसिरीजच्या दुकानाला अचानक लागलेल्या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवांनानी वेळीच आग आटोक्यात आणल्याने शेजारील चार दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडण्यापासून वाचली. ही घटना आज मंगळवार दि. 21 मे रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली.
पिंपरी शहरातील साई चौक येथील आनंद मोबाईल मार्केट मधील एका मोबाईलच्या दुकानाला दुपारी दीड वाजताच्या सुमारास आग लागली होती. आगीची माहिती मिळताच संत तुकाराम नगर येथील अग्निशमन केंद्रावरील दोन गाड्या व भोसरी, प्राधिकरण व तळवडे येथील प्रत्येकी एक अशा एकूण पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या परिसरात एकमेकांना चिटकून खूप दुकाने आहेत, तसेच या ठिकाणी नेहमीच नागरिकांची खूप वर्दळ असते. आग पसरली असती, तर मोठी हानी होण्याची दाट शक्यता होती. वरच्या मजल्यावर आग लागली होती.
आग पसरण्याची भिती लक्षात घेत अग्निशमन दलाच्या जवांनानी वरील मजल्यावरील बॅनर फाडून वरच्या मजल्यावर प्रवेश केला. दुकानामध्ये लगेच पेट घेईल, असे सामान मोठ्या प्रमाणात असल्याने आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना अथक प्रयत्न करावे लागले. सुमारे अर्धा तास पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. मात्र, तो पर्यंत दुकानातील सर्व मोबाईलचे साहित्य जळून खाक झाले होते. अग्निशामक दलाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी तात्काळ केलेल्या हालचालीमुळे मोठी हानी टळली.