लंडन – विश्वचषक स्पर्धेत गुरवारी पावसामुळे भारताचा न्यूझीलंडशी होणारा सामना रद्द झाल्याने भारतीय चाहते चांगलेच नाराज झाले होते. मात्र त्यानंतर आता जगभरातील क्रिकेटचाहत्यांसह अनेक आजी माजी क्रिकेटपटूना रविवारी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता लागली आहे. पण या सामन्यावर देखील पावसाचे सावट राहिल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
विश्वचषक हा क्रिकेटचा आहे की पावसाचा असा प्रश्न येथील चाहत्यांना पडला आहे. आतापर्यंत चार सामने पावसाने धुतले असल्यामुळे चाहत्यांमध्ये कमालीची नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. विश्वचषक स्पर्धेचे संयोजन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर चाहत्यांनी समाज माध्यमाद्वारे चांगलेच मजेदार ट्विट केले आहेत. आता यामध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याचे नाव जोडले गेले आहे.
शोएब अख्तर याने आपल्या ट्विटर खात्यावरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबतच त्याने रविवारी पाऊस होण्याची भविष्यवाणी देखील केली आहे.
शोएबने ट्विटमध्ये कॅप्शनमध्ये म्हटले आहे, रविवार होणाऱ्या सामन्याचं चित्र मला अस दिसतय… हाहा…!
Sunday looking a bit like this. Haha#PAKvIND #CWC19 pic.twitter.com/rTO70ru6UY
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) June 14, 2019
संबंधित फोटोमध्ये मैदानावरती संपूर्ण पाणी साचलेले दिसत आहे. क्रिकेट एक्सपर्ट हे नावेत बसून चर्चा करत आहेत, तर भारतीय कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तान कर्णधार सर्फराज अहमद हे टाॅसनंतर पोहत पव्हेलियनकडे जाताना दाखविण्यात आलं आहे. त्याच हे मजेदार ट्विट युवराज सिंगने देखील रिट्विट केले आहे.
दरम्यान, रविवारी होणाऱ्या भारत वि पाकिस्तान सामन्यात पाऊस होईल की नाही यासंबंधी अंदाज व्यक्त करणे अवघड आहे, कारण याआधी चार सामने पावसामुळं रद्द झाले आहेत. त्यामुळे आता साऱ्याचं लक्ष भारत वि पाकिस्तान सामन्याकडे लागले आहे. भारत-पाकिस्तान हे विश्वचषक स्पर्धेत सातव्यांदा आमनेसामने असतील. भारताने विश्वचषक स्पर्धेत सहावेळेस पाकिस्तानला पराभूत केलं आहे.