मुंबई – श्रीलंकेत बुरखाबंदीनंतर भारतातही अशी बंदी करण्याची मागणी भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेने केली होती. शिवसेनेने आपले मुखपत्र सामानातून ही मागणी करण्यात आली होती. मात्र आता शिवसेनेने बुरखा बंदीच्या मागणीवरून युटर्न घेतला आहे. सामना संपादकीय हे संपादकाचे वैयक्तीक मत असल्याचे शिवसेनेने म्हंटले आहे. हे पक्षाचे अथवा पक्षाध्यक्षाचे मत नसल्याचेही शिवसेनेने स्पष्ट केले.
काय होते सामना संपादकीय
फेस मास्क किंवा इतर साधनांनी चेहरा झाकणार्या व्यक्ती राष्ट्रीय आणि सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरेल, असे जाहीर करून श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस व धैर्याचे दर्शन घडवले. रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? पंतप्रधान मोदी आज अयोध्येला निघाले आहेत, म्हणूनच हा प्रश्न. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात व ब्रिटनमध्येही हेच घडले आहे. मग याबाबतीत हिंदुस्थान मागे का? एक तर असंख्य मुस्लिम तरुणींना बुरखा झुगारायचा आहेच व दुसरे म्हणजे बुरख्याआडून नेमके काय सुरू असते याचा अंदाज येत नाही. बुरख्यांचा वापर करून देशद्रोह, दहशतवाद घडवला जात असल्याची उदाहरणे समोर आली. तुर्कस्तान हे तसे इस्लाम मानणारे राष्ट्र, पण केमाल पाशाला बुरख्याआड काही घडत असल्याचा संशय येताच त्याने त्याच्या देशात मुसलमानी तरुणांची दाढी व बुरख्यांवर बंदी आणलीच होती. रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार, असा सवालही सामानातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला होता.