मुंबई – शिवसेनेने पिक विमा योजनेच्या संबंधात विमा कंपन्यांच्या विरोधात शेतकऱ्यांची बाजू घेऊन मोर्चा काढणे म्हणजे एक नौटंकी आहे अशा शब्दात विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडवेट्टीवार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. सत्तेत राहुनही विरोधक असल्याची भूमिका शिवसेनेने वठवणे हा निवडणुकीच्या तोंडावर केलेला एक राजकीय फार्स आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की सत्तेत असताना त्यांना विरोधकांची भूमिका बजावण्याची त्यांना गरजच काय हे समजत नाही. शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत मूग गिळून गप्प बसतात आणि बाहेर शेतकऱ्यांचा हितासाठी मोर्चा काढतात याला नौटंकी शिवाय दुसरी कोणतीही उपमा देता येणार नाही. असले मोर्चे काढण्यापेक्षा त्यांनी सरकारी यंत्रणांना शेतकरी हिताचे आदेश देणे महत्वाचे आहे. शिवसेनेला प्रशासनात आणि सरकार मध्ये कोणतीहीं किंमत उरलेली नसल्याने त्यांचे कोणीहीं ऐकत नाहीं म्हणून त्यांच्यावर मोर्चे काढण्याची वेळ आली आहे असे ते म्हणाले.
विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या पिक विम्याची रक्कम वेळेवर देत नसतील तर हा विषय सरकारी पातळीवर हाताळायला हवा. पण ते करून दाखवण्याची शिवसेनेत हिंमत नाही. विमा कंपन्या आणि सरकारमध्येच हातमिळवणी झाली आहे असा आरोपही वडवेट्टीवार यांनी केला. शिवसेनेला शेतकरी हिताची इतकीच काळजी असती तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडून या सरकारलाही खाली खेचायला हवे होते, अशी टिपण्णीही त्यांनी केली.