शिर्डी – शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवास आज उत्साही वातावरणात सुरुवात झाली. श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. उद्या उत्सवाचा प्रमुख दिवस असून, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आहे.
आज उत्सवाच्या पहिल्या दिवशी पहाटे पाच वाजता श्रींच्या प्रतीमेची व श्री साईसच्चरित या ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संस्थानचे विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे यांनी वीणा, विश्वस्त बिपीन कोल्हे यांनी पोथी, तर विश्वस्त ऍड. मोहन जयकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी श्रींची प्रतिमा घेऊन सहभाग घेतला. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, विश्वस्त तथा नगराध्यक्षा अर्चनाताई कोते, नलिनी हावरे, सरस्वती वाकचौरे, स्मिता जयकर, प्रशासकीय अधिकारी सूर्यभान गमे, ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूक द्वारकामाई मंदिरात आल्यानंतर तेथे श्री साईसच्चरित ग्रंथाच्या पारायणास नलिनी हावरे यांनी प्रथम, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे यांनी द्वितीय, विश्वस्त तथा नगराध्यक्षा कोते यांनी तृतीय अध्याय, विश्वस्त ऍड. जयकर यांनी चौथा व साईभक्त अंजलीताई दाभोळकर यांनी पाचवा अध्याय वाचन करुन प्रारंभ केला.
उत्सवानिमित्ताने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा केली. तसेच राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. दुपारी साडेबारा वाजता माध्यान्ह आरती झाली. सायंकाळी चार ते सहा यावेळेत डोंबीवली येथील गंगाधरबुवा व्यास यांचे कीर्तन झाले. रात्री साडेसात ते 10 यावेळेत नाशिक येथील अश्विनी जोशी यांचा भजन संध्या कार्यक्रम झाला. रात्रौ सव्वानऊ वाजता श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले. तसेच श्री साईसच्चरित पारायाणासाठी व्दारकामाई मंदिर रात्रभर उघडे ठेवण्यात आले.
उद्या (दि.16) उत्सवाच्या मुख्य दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे श्रींच्या शेजारतीनंतर समाधी मंदिर बंद राहील. उद्या पहाटे साडेचार वाजता श्रींची काकड आरती, पाच वाजता श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती होणार आहे. 5.20 वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी सहा वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी साडेबारा वाजता श्रींची माध्यान्ह आरती व सायंकाळी चार ते सहा या वेळेत गंगाधरबुवा व्यास यांचा कीर्तन कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी सात वाजता श्रींची धूपारती होईल. रात्री साडेसात ते दहा यावेळेत पुणे येथील पं. राजा काळे यांचा अभंगांचा कार्यक्रम, रात्री सव्वानऊ वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच रात्रौ बारा वाजता श्रींची शेजारती होईल.