गोंदवले – माण-खटाव तालुक्यात शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गेल्या 8 वर्षांपासून मागेल त्यांना गावोगावी, वाड्यावस्त्यांवर जावून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यावर्षीही शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानने भीषण पाणीटंचाईत नागरिकांना पाण्याची झळ बसू दिली नाही. माण-खटावच्या नागरिकांबरोबरच येळेवाडी येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचीही तहान भागवण्याचे काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले जात आहे. या उपक्रमाबद्दल प्रतिष्ठानचे कौतुक केले जात आहे.
येळेवाडी (ता. माण) येथे श्री संत गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा व बालगृहे असून त्यात तीनशेहुन अधिक गोरगरीब, दिनदलित, अनाथ, असहाय्य विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. माण तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे तीव्र पाणीटंचाईची झळ विद्यार्थ्यांनाही बसू लागली होती. आश्रमशाळेच्यावतीने प्रतिष्ठानकडे पाणी देण्याची अर्जाद्वारे विनंती करण्यात आली होती. याची तत्काळ दखल घेत शेखरभाऊ गोरे यांनी कार्यकर्त्यांना सांगून पाण्याचा टॅंकर पाठवून दिला. त्यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची तहान भागली आहे.
आश्रमशाळेच्यावतीने प्रतिष्ठानचे आभार मानले जात आहेत. येळेवाडी आश्रमशाळेसाठी मागेल त्यावेळी पाणी देणार असल्याचे प्रतिष्ठानच्यावतीने सांगण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक शिवाजीराव महानवर, मुख्याध्यापिका सुरेखा महानवर, अधिक्षक, सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.आश्रमशाळेच्यावतीने टॅंकरची मागणी केली होती. याची दखल घेत शेखरभाऊंनी त्वरित टॅंकर पाठवून दिल्याने विद्यार्थ्यांची पाण्याची सोय झाली आहे. सामाजिक कार्य करणारे शेखरभाऊ गोरे व त्यांच्या प्रतिष्ठानचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.