नगर तालुक्याचा घेतला टंचाई आढावा: छावणी चालकांकडे चोर या नजरेने पाहणे चुकीचे
नगर – सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळाचे सावट आहे. टंचाई निवरण्यासाठी भविष्यात काय उपाय योजना करण्यात येतील यावर चर्चा होणे गरजेचे असून येत्या पाच वर्षात जिल्हा टॅंकरमुक्त करू त्यासाठी गटतट सोडून दुष्काळावर बोला असे, नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे यांनी नगर तालुका आढावा बैठकीत सांगितले.
नगर तालुका टंचाई आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे बोलत होते.
यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हा परिषद् सदस्य संदेश कार्ले, सभापती रामदास भोर, जिल्हा परिषद सद्स्य गोविंद मोकाटे, तहसीलदार उमेश पाटील, ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर (गुरुजी), जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, पशुसंवर्धन अधिकारी सुनील तुंबारे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे, बिडीओ वसंतराव गारुडकर, नायब तहसीलदार वैशाली आव्हाड, मंडळाधिकारी, कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदार पाटील यांनी तालुक्यात सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. पाटील म्हणाले, तालुक्यात दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांचे पशुधन जगविण्यासाठी एकूण 66 चारा छावण्या सुरु असून त्यात दाखल झालेल्या लहान-मोठ्या पशुधनाची संख्या 51 हजार 924 आहे. तसेच 43 गावे व 274 वाड्या-वस्त्यांना 70 टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी खा.विखे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सूचना करताना या बैठकीत टॅंकर पाणीपुरवठा, चारा छावणी या महत्त्वाच्या विषयावर बोलण्याची सूचना केली. तसेच विषय सोडून बोलू नका व आरोप-प्रत्यारोप न करता नागरिक व प्रशासनातील अधिकारी यांचा सुसंवादातून प्रश्न मार्गी लागावेत, हाच हेतू या बैठकीच्या आयोजनामागे असल्याचे सांगितले. नवनागापूर, ससेवाडी, बहिरवाडी, नारायण डोह, बुरुडगाव, हमीदपूर, निंबळक, वाळकी, पिंपळगाव माळवी, भातोडी, खडकी, वाटेफळ, साकत, पांगरमल, कोल्हेवाडी, मठ पिंपरी, चिचोंडी पाटील, मांजरसुंबा, अरणगाव आदी गावातील लोकप्रतिनिधींनी पाणीपुरवठा योजना व टॅंकरच्या संदर्भात समस्या मांडल्या. त्यावर खासदार विखे यांच्या समक्ष गटविकास अधिकारी गारूडकर आणि तहसीलदार उमेश पाटील यांनी खुलासे केले. डॉ.विखे म्हणाले की, आगामी पाच वर्षाच्या काळात देशाच्या संसदेमध्ये मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्ती केली तरच आपण पाच वर्षांनी पुन्हा मते मागायला येऊ. तसेच लोकसभा मतदारसंघात समन्वय समितीच्या माध्यमातून दर सहा महिन्याला बैठका घेतल्या जातील.
नागरिकांना भेडसावणारे प्रश्न व अडचणी याबाबत लेखी स्वरूपात नागरिकांचे अर्ज मागविले जातील. विभाग निहाय त्या तक्रार अर्जाचे वर्गीकरण केले जाईल. तसेच छावणी चालकांकडे चोर या नजरेने पाहणे चुकीचे असून दुष्काळाच्या भयान परिस्थितीमध्ये प्रसंगी व्याजाने पैसे काढून छावणी चालकांनी पशुधनाच्या संगोपनात मोठा हातभार लावला आहे. जिल्ह्यातील छावणी चालकांचे आपण अभिनंदन करतो. त्यांची अनुदानाची बिले प्रशासनाकडून वेळेत अदा केली जावीत. यासाठी आपण जिल्हाधिकारी यांच्याशी बोलणार आहोत.