कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीत जे अपेक्षीत होते ते झाले आहे. गेल्या पाच वर्षांत भाजपने कोणतीही निवडणूक हरलेली नाही. असे म्हणत पश्चिम महाराष्ट्रातील बारामतीमध्ये काहीही करून जिंकू असे मी म्हटले होते, पण त्या ठिकाणी आज आलेल्या निकाल अनपेक्षित आहे. शरद पवार यांना आपली मुलगी असून देखील त्यांना विजयाची खात्री नव्हती, अशा शब्दांत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान देशातील सिस्टम वरती माझा भरोसा असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. “बारामती किस झाड की पत्ती’ असे म्हणत बारामतीमध्ये मी दोन खोल्यांचे घर भाड्याने घेतले असून दर पंधरा दिवसाला तिथल्या जनतेला भेटण्यासाठी मी बारामतीला जाणार आहे. तेथील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. जरी शरद पवारांनी मला चहा प्यायला बोलावलं नाही तरी मी त्यांच्याकडे गेल्यावर मला चहा प्यायला ते नाही म्हणणार नाहीत, असे देखील पाटील यावेळी म्हणाले.
तसेच बारामतीमध्ये भाजपचा उमेदवार पराभूत झाल्यानंतर ईव्हीएम मशीनवरती आम्ही कोणताही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही, असा टोला देखील त्यांनी पवारांना लगावला.