– योगेश नं. काटे
आर्यवर्त देश पवित्र। तिथे नांदले धर्मराजे सुपात्र। तया आठविता महापुण्यराशि। नमस्कार माझा पुण्यमातृभूमिशी।।
ही काव्यपंक्ती कुठे तरी वाचली आणि या पंक्तीतील धर्मराजे कोण? असा विचार मनात आला आणि पहिले नाव “श्रीमद् आद्य शंकराचार्य’ यांचे नाव समोर आले.
भारतीय तत्त्वज्ञान, अध्यात्मिक विचारांवर व सर्व सांप्रदायिक परंपरांवर आचार्य यांच्या तत्वज्ञानाचा प्रभाव आजपर्यंत दिसतो आचार्यांचा जीवनकाळाचा अभ्यास करीत असताना त्यांचे जीवनकार्य हे अलौकिक असे वाटते. निरश्वरवादी आणि वेदप्रामाण्य नाकारणाऱ्या पंथांचा उदय झाला व प्रसार प्रचार जोमाने होऊ लागला. तसेच सनातन वैदिक धर्मातील पंथ, संप्रदाय आपले अस्तित्व स्वतंत्र माडण्याचा प्रयत्न करीत होते. अशा कालखंडात आचार्यांचा जन्म झाला.
अष्टमे चतुरो वेदाः द्वादशे सर्व शास्त्रवित्। षोडशे कृतवान्ं भाष्य द्वात्रिशे मुनिरम्याते।।
अर्थ : या महान पुरुषाने वयाच्या आठव्या वर्षी चारही वेदांचा अभ्यास पूर्ण केला. बाराव्या वर्षापर्यंत सर्वशास्त्र पारंगत झाले. ब्रह्मसुत्रावरील शारीरिक भाष्य हे वयाच्या सोळाव्या वर्षी लिहिले आणि पुढील सोळा वर्षे आसेतुहिमाचल धर्मप्रचार तद्नंतर समाधिस्थ. आचार्य यांचा जन्म केरळातील कालडी गावात झाला. संन्यास दीक्षाग्रहण म.प्र. येथील ओंकारेश्वर येथे झाली. हिमालयात भाष्यलेखन आणि शास्त्रार्थ अर्थात खंडन-मंडन कार्याचा आरंभ “भट्टपाद’ यांच्या भेटीनंतर झाला.
आचार्य यांची वैचारिक झुंज ही दोन्ही बाजूंनी होती. आचार्यांनी विविध तर्कांच्या आधारे खंडित करून गीताभाष्य, दशोपनिषदभाष्य ब्रह्मसूत्रावरील भाष्य यांच्या माध्यमातून श्रुतीप्रणित केवलद्वित व ज्ञानप्रधान शुद्ध वैदिक विचार मांडून पुनश्च एकदा भारतीय जनमानसावर वेदश्रद्धेचा ठसा उमटविला. तसेच त्यांनी सांख्य, शैव, शाक्त या सर्व मतांचे खंडन केले. या मतमतांच्या गलबल्यातून भारतीय समाजमनाला बाहेर काढून उदात्त व व्यापक अशा वैदिक विचार प्रवाहात आणले. हे फार मोठे कार्य आचार्य यांनी विपुल ग्रंथसंपदा, विविधशास्त्रार्थ अखंड धर्मप्रसार व समन्वयाच्या बळावर साध्य केले
आचार्य यांनी वापरलेली भाषा ही सहज, ओघवती, रसाळ आणि प्रासादिक आहे. अर्थ लक्षात न घेतासुद्धा नुसतेच संस्कृत वाचीत बसावे असे वाटते. याची तुलना म्हणजे ज्ञानेश्वरांची जशी मराठी तसेच आचार्य यांची संस्कृतवाणी असेच म्हणावे लागेल.
आचार्य यांनी अद्वैताच्या साहाय्याने (भूमिकेवरून) सर्वांचा समन्वय हे त्यांचे फार मोठे कार्य आहे. वैदिक उपासनामार्गावरील तंटे मिटवून अद्वैताच्या साहाय्याने भगवत उपासना सुरू केली.
“एकम् सन्तम् बहुधा कल्पयन्ति” या वैदिक घोषणेनुसार सैव, वैष्णव, सौर, शाक्त आणि गाणपत्य या सर्वांचे तंटे मोडीत काढून कर्म, उपासना आणि ज्ञानाची योग्यता दाखवून दिली. सर्व वैदिक समाजास वेदछत्राखाली आणून आपण एकाच वेदमातेची लेकरे आहोत याची जाणीव करून दिली. हे फार मोठे कार्य आचार्य यांनी केले.
तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक शं. वा. दांडेकर म्हणतात, “हिंदूस्थानातच नव्हे तर, सर्व जगतात ज्या काही असामान्य विभूति होऊन गेल्यात त्या थोर विभूतींपैकी ज्यांचा निर्देश करता येईल असे आद्य शंकराचार्य होत.’
प.पू. स्वामीवरदानंद भारती आचार्यांविषयी म्हणतात, “आचार्यही आहेत, तत्त्ववेत्तेही आहेत आणि सत्पुरुषही आहेत. असा त्रिवेणी संगम क्वचित आढळतो.
थोर विचारवंत कै. नरहर कुरुंदकर श्रीमानयोगी या ग्रंथाच्या प्रस्तावनेत म्हणतात, “शंकराचार्य आणि ज्ञानेश्वर यांचे जीवन अभ्यासताना तर्क लुळा पडतो.’
शेवटी आम्ही भारतीय त्यांचे ऋण आपल्या मस्तकी धारण करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊ या. माझी ही लेखसेवा सद्गुरू चरणी अर्पण.
शास्त्रं शारीरमीमांस देवस्तु परमेश्वरः।
आचार्यः शंकराचार्यः सत्नु मे जन्मजन्मनि।।
असमदगुरूतंर्गत तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु।।
सद्गुरू दासगणू महाराज की जय।।