पुणे: चोऱ्या करत असल्याची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयावरून टपरी चालकाच्या डोक्यात दगड घालून त्यांच्या मृत्यूस कारणीभुत ठरणाऱ्याला सात वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस.एच.ग्वालानी यांनी सुनावली. दंड न भरल्यास एक वर्षे अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे. तर, त्या टपरी चालकाला मारहाण करणाऱ्या आरोपीच्या वडिलांना दीड वर्षे आणि आईला दहा महिन्याची म्हणजे ते जेवढा काळ तुरूंगात होते. तेवढी शिक्षा आणि प्रत्येकी 1 हजार रुपये दंड सुनावण्यात आला आहे.
चिल्या ऊर्फ मलकाप्पा शंकर गायकवाड (वय 21) याला सात वर्षे शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर वडिल शंकर मलकाप्पा ऊर्फ गणपती गायकवाड (वय 45) यांना 15 महिने आणि आई सरस्वती (वय 40, तिघेही, रा. विजयनगर कॉलनी, दीघी) यांना दहा महिने तुरूंगवासाची शिक्षा झाली आहे.
मुन्ना ऊर्फ गुरूप्रसाद राजेंद्र चौरसिया (वय 35, रा. दीघी) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्यांचा धाकटा भाऊ सनी (वय 26) याने याबाबत दीघी पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना 10 जून रोजी 2015 सकाळी 7.30 ते 7.45 च्या दरम्यान घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी काम पाहिले. त्यांनी 11 साक्षीदार तपासले. दीघी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे यांनी या प्रकरणाचा तपास केला. तर न्यायालयीन कामकाजासाठी सहायक पोलीस फौजदार दत्तात्रय ननावरे आणि पोलीस शिपाई उमेश जाधव यांनी मदत केली. मुन्ना यांची टपरी दिघी बस स्टॅंडजवळ आहे. चिल्या चोऱ्या करत असल्याची माहिती मुन्ना यांनी पोलिसांना दिल्याच्या संशयावरून घटनेच्या आदल्या दिवशी रात्री 10 वाजता ते टपरी बंद करत असताना चिल्या याने त्यांना शिवीगाळ केली. दुसऱ्या दिवशी सकाळी आई-वडिलांना घेऊन तो टपरीजवळ गेला. त्यांनी मुन्ना यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण केली. त्यावेळी तेथे पडलेला दगड उचलून चिल्या याने मुन्ना यांच्या डोक्यात घातला. त्यामध्ये मुन्ना यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणात पोलिसांनी तिघांविरोधात तपास करून भादवी कलम 302 (खून) नुसार दोषारोपपत्र दाखल केले. यावर युक्तीवाद करताना ऍड. घोगरे पाटील यांनी तिघांना अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने चिल्या याला भादवी कलम 304 (मृत्यूस कारणीभुत ठरणे) नुसार, तर आई-वडिलांना 323 (मारहाण) नुसार शिक्षा सुनावली. आई-वडिलांच्या वतीने ऍड. इब्राहिम शेख यांनी काम पाहिले. आई-वडिलांनी केवळ लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. त्यामध्ये मृत्यू होणे शक्य नाही. दोघांचेही मयताला मारण्याचे नियोजन अथवा हेतू नव्हता, त्यामुळे त्यांना भादवी कलम 302 लागू होत नाही, असा युक्तीवाद ऍड. शेख यांनी केला.